मातोश्रीचा उल्लेख असलेल्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हायला हवी – पाटील

कोल्हापूर – मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची नोंद आहे, हे मला माहिती नाही. पण मला एवढेच दिसते आहे की, चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही आणि खूप काही होणार आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले.

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले तरी केंद्रीय तपासी यंत्रणा स्वायत्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. या यंत्रणांच्या तपासाची आपल्याला काही माहिती नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाला यशवंत जाधव यांच्याकडे कसली डायरी सापडली हे सुद्धा माहिती नाही. मात्र एवढी खात्री आहे की, या चौकशीतून कोणीही सुटू शकणार नाही. खूप काही होणार आहे, हे सुद्धा दिसते आहे. यावेळी मातोश्रीचा उल्लेख असलेल्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हायला हवी या भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या मागणीचे प्रदेशाध्यक्षांनी समर्थन केले.

अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ ठरले आहेत. त्यांच्या भितीने महाविकास आघाडीचे मंत्री आरोप करत आहेत. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आहे. सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपण सामना वृत्तपत्र वाचणे आणि संजय राऊत यांच्याबद्दल बोलणे बंद केले आहे, असे ते म्हणाले.