राज्यातील ऊर्जाक्षेत्र सध्या प्रचंड अडचणीतून मार्गक्रमण करत आहे : ऊर्जामंत्री 

पनवेल :  राज्यातील ऊर्जाक्षेत्र सध्या प्रचंड अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. कोविड महामारी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणला कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी वीज क्षेत्रात कार्यरत अभियंत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

सबॉर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशनच्यावतीने पनवेल येथे उभारण्यात आलेल्या अभियंता भवन या इमारतीचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (प्रकल्प/मा.सं.) भालचंद्र खंडाईत, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे, महानिर्मितीचे संचालक (संचालन) चंद्रकांत थोटवे, महापारेषणचे संचालक (संचालन) अनिल कोलप, संचालक (प्रकल्प) नासिर कादरी, असोसिएशनचे अध्यक्ष केदार रेळेकर, सरचिटणीस संजय ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत पुढे म्हणाले, पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची दूरदृष्टी आणि पहिले ऊर्जामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या ऊर्जा क्षेत्राने दैदिप्यमान वाटचाल केली. परंतु सध्या प्रचंड थकबाकी, विजेचे अधिक दर, वाढती तांत्रिक आणि वाणिज्यिक वीजहानी, वीज निर्मिती आणि पारेषणचा अधिक खर्च, मोठी ग्राहक संख्या अशी आव्हाने राज्यातील वीज क्षेत्रासमोर आहेत. या आव्हानांचा सामना करून यशस्वी होण्यासाठी अभियंत्यांनी काम करावे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० चा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी खा. सुनील तटकरे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास राज्यभरातून आलेले अभियंते उपस्थित होते.

थकबाकी वसुली, वीज गळती कमी करणे, वीजखरेदी दर कमी करणे हिच यशाची त्रिसूत्री :  विजय सिंघल

महावितरणची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती सविस्तरपणे विशद करून या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक बाबींवर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  सिंघल यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ग्राहकांनी उपभोगलेल्या विजेचे बिल वसूल केल्याशिवाय महावितरणला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा दुसरा मार्ग नाही. विजेवर चालणाऱ्या मोबाईल, डिश टीव्ही इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू यावर वीज ग्राहक खर्च करतो. पण वीजबिल भरण्याबाबत टाळाटाळ होते. ग्राहकांच्या या मानसिकतेत बदल घडवून वेळेवर वीजबिल भरण्याची सवय लावली तरच महावितरणचे अस्तित्व टिकणार आहे. बदल घडवण्याची मानसिकता ठेवून काम करण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच श्री. सिंघल यांनी या मानसिकतेने काम केल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीत वाढ झाल्याचे स्पष्ट केले. वीजबिल म्हणजे कोणताही कर (टॅक्स) नाही; तर विकत घेऊन उधारीवर पुरविलेल्या वीज सेवेची किंमत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे पैसे भरून घ्यावेच लागतील. वसुली करताना कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाणीच्या घटना दुर्दैवी आहेत, अशा प्रसंगी महावितरण ठामपणे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, थकबाकीची रक्कम ७३ हजार कोटी रुपयांच्या पुढे पोहचली असून महावितरण बिकट परिस्थितीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. अशा प्रसंगी थकबाकी वसुली, वीज गळती कमी करणे, वीज खरेदी दर कमी करणे या त्रिसूत्रीचा उपयोग करून महावितरणला आर्थिक अडचणीतून बाहेर काढता येणे शक्य आहे. त्यासाठी सर्वांनी बदल घडवण्याचा ठाम निश्चय करून या त्रिसूत्रीवर काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.