ओबीसी बांधव, दलित बांधव प्रगती करत आहेत ही बाब भाजपच्या मनुवाद्यांना नेहमीच खटकते – राष्ट्रवादी 

पुणे – मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज आपल्या अठरा पगड जातीतील ओबीसी बांधवांचं हक्काचं आरक्षण हिरावले गेलं आहे असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. म्हणूनच काल मोदी सरकारमधील खासदार, पुणेकरांचे संसदेतील प्रतिनिधी असलेल्या खा. गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

जगताप म्हणाले, मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डेटा सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केवळ महाराष्ट्रातील नवे तर देशभरात अनेक राज्यांतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जानेवारी २०१४ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात UPA सरकारने ओबीसी बांधवांचा इम्पिरिकल डेटा स्वीकारून ओबीसी बांधवांचं आरक्षण अबाधित राखले होते. मात्र मे २०१४ मध्ये देशातील जनतेला फसवून नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आलं आणि इम्पिरिकल डेटा मध्ये दोष आहेत असं कारण देत मोदी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या वाटेत काटे पेरले. नरेंद्र मोदींच्या या कृतीमागे भाजपची व RSS ची मनुवादी वृत्ती आहे.

या देशातील ओबीसी बांधव, दलित बांधव प्रगती करत आहेत ही बाब भाजपच्या मनुवाद्यांना नेहमीच खटकते. महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचं आरक्षण स्थगित होण्यालाही भाजप कारणीभूत आहे. अवधूत वाघ नावाच्या एका इसमाने औरांगाबाद खंडपीठात ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं. हा अवधूत वाघ भारतीय जनता पक्षाचा राज्य सरचिटणीस आहे, राज्य प्रवक्ता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, राज्यात भाजपची सत्ता असतानाच भाजपचा पदाधिकारी असलेल्या अवधूत वाघ याने ओबीसी आरक्षणाला आव्हान दिलं हा केवळ योगायोग नाही, हा भाजपने विचारपूर्वक रचलेला कट आहे. असे असतानाही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल ओबीसी बांधवांबाबत खोटा कळवळा दाखवत आंदोलन केले, ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तीव्र शब्दांत निषेध केला.

हा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज भाजपचे खा. गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. बापट हे संसदेचे सदस्य आहेत, दिल्लीत संसदेचे अधिवेशन सध्या सुरु आहे. खा. बापट यांनी इम्पिरिकल डेटा जाहीर करण्याची मागणी संसदेत करावी, त्यात काय दोष आहेत तेही देशासमोर जाहीर करावे अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. केवळ RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी नरेंद्र मोदींनी आमच्या ओबीसी बांधवांना वेठीस धरण्याच काम करू नये असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकाळात १९९० साली मंडल अयोग्य स्वीकारून ओबीसी बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. त्यानंतर आमच्या ओबीसी बांधवांना जिल्हा परिषद, महानगरपालिकेत प्रतिनिधित्व मिळालं, राज्यात ओबीसी नेतृत्व उभं राहिलं. हीच बाब भाजपच्या मनुवाद्यांनी खटल्यामुळे ओबीसी आरक्षण घालवण्याचा कुटील डाव भाजपने रचला आहे. याचा जाब येत्या काळात ओबीसी बांधवांकडून भाजपला नक्कीच विचारला जाईल. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख,ओबीसी सेल शहराध्यक्ष .संतोष नांगरे, सौ.मृणालिनीताई वाणी , गणेश नलावडे,दिपक पोकळे आदिंसह मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.