शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारच्या संवेदना बोथट; शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग -पवार  

मुंबई  – अवकाळी पाऊस, गारपीटीने राज्यातील शेतकरी (Farmer) अडचणीत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते असा थेट आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाफेडकडून अजूनही शेतमाल खरेदी सुरु नाही, सरकारकडून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत असा आरोप करत शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारचा निषेध करत विरोधी पक्षाने सभागृहातून सभात्याग केला.

अवकाळी पावसाने व गारपीठीने राज्यातला शेतकरी संकटात आला आहे. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले असताना राज्याचे मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या भावना बोथट आहेत. सरकारच्यावतीने सभागृहात करण्यात आलेले निवेदन अपुरे आहे, अनेक नुकसानग्रस्त भागांचा उल्लेख या निवेदनात नाही. राज्यातला शेतकरी हतबल असताना सरकारने बघू, करु अशी उत्तरे न देता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.