ठाकरे सरकारच्या अहंकारामुळे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र विधिमंडळाचे दिवाळे निघाले –  शेलार

मुंबई – बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणात ठाकरे सरकारने अहंकारी भूमिका घेतली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात कधी नाही तेवढी महाराष्ट्र विधिमंडळाची नाचक्की झाली, दिवाळे निघाले, अशी टीका भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.

शेलार म्हणाले, भाजपाच्या 12 आमदार निलंबनाचा विषय आज विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाचे याचिकाकर्ते आमदार अँड आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यातील काही भाग वाचून त्यांनी बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळाने आमदारांना निलंबित करण्याचा ठराव हा अवैध, असंविधानीक, अतार्किक असल्याचे म्हटले आहे .त्यामुळे हा ठराव खारीज झाल्याने 12 आमदारांना सभागृहात येण्याचे मार्ग खुले झाले.

विधिमंडळाचे अधिकार सर्वतोपरी अबाधित रहावे  अशीच भाजपाची भूमिका असून या ठरावावर निर्णय देताना ही न्यायालयाने सभागृहाच्या अधिकारावर गदा आणलेली नाही. निलंबनाचा अधिकार अबाधित ठेवला आहे.याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना न्यायालयाने विधिमंडळाचे अधिकार अबाधित रहावे म्हणून याबाबत बारा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका करावी, विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी करुन याबाबत निर्णय घ्यावा असेही अंतरिम आदेश दिले होते त्यावेळी 12 आमदारांनी याचिका करुनही विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना सुनावणी केली नाही.तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयात आपली बाजु मांडावी अशी नोटीस न्यायालयाने दिली होती त्यावेळी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर येणार नाही अशी  भूमिका घेण्यात आली.तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमुर्तीं च्या खंडपीठाने निवाडा दिल्यानंतर याबाबत अपिल दाखल करण्यात आलेला नाही.त्यामुळे या संधी विधिमंडळाने गमावल्या आहेत.

याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य करणार नव्हतो पण सरकारकडून वारंवार विपर्यास करुन माहिती दिली जात आहे. हा ठराव अवैध, असंविधानीक, अतार्किक  नाही असे सरकारकडून सांगितले जाते आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मारलेल ताशेरे पुन्हा वाचून दाखवत आमदार अँड आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारच्या याच अहंकारामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली, अशी टीका त्यांनी केली.