‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत नवाब मलिक यांचा वानखेडेंना थेट इशारा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे पोलखोल सत्र सुरु ठेवले आहे. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती माध्यमांसमोर मांडली. समीर वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खोट्या प्रकरणांमध्ये अनेक लोकांना तुरुंगात टाकले, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

मागील एक महिन्यापासून परिस्थिती बदलली आहे. समीर वानखेडे सांगतात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला गेला. या आरोपाचे नवाब मलिक यांनी खंडन केले. यामागची सर्व कारणे मलिक यांनी स्पष्ट केली. शिवाय वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो मला रात्री दोन वाजता मिळाला. ज्यांनी फोटो दिला त्यांनी माझ्याकडून हा फोटो माध्यमांपुढे यावा, अशी इच्छा व्यक्त केली. ही लढाई कोणाच्या धर्माशी अथवा परिवाराशी नसून ही लढाई अन्यायाविरोधातील आहे, हे मलिक यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आजही मुंबई शहरात शंभरहून अधिक निरपराध लोक तुरुंगात आहेत. त्यांना खोट्या आरोपात अटक झाली आहे. यासंदर्भात २६ प्रकरणांचे पत्रक एनसीबीच्या डिजींना दिले असता याची चौकशी होईल असे सांगण्यात आले, मात्र कायद्यानुसार सादर केलेल्या माहितीमध्ये कोणाचे नाव नसल्याने या प्रकरणाची दखल घेण्यात आली नाही. तरीही या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. या २६ प्रकरणातील २२ क्रमांकाच्या प्रकरणात एका नायजेरीयन नागरिकाला खोट्या आरोपात अडकविण्यात आले. या कारवाईतील पंच कांबळे यांनी याची कबुली दिली आहे. त्यामुळे मी दिलेल्या पत्राच्या माध्यमातून या २६ प्रकरणांची चौकशी बंद न करण्याची मागणी एनसीबीच्या डिजींकडे करणार असल्याचे ते म्हणाले.