‘राष्ट्रवादी हा समाजातील वेगवेगळ्या घटकांचे सुख-दुःख समजून घेणारा, प्रसंगी अडचणीत मदत करणारा पक्ष’

मुंबई   – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी प्रयत्न करणारा, त्यांचे सुख-दुःख समजून घेणारा, प्रसंगी अडचणीत मदत करणारा पक्ष आहे. त्यामुळे साहजिकच तुम्ही सर्वजण आणि सहकारी करत असलेल्या कष्टांची नोंद घेतल्यानंतर तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या काळात तुमच्या पाठिशी उभे राहणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP National President Sharad Pawar) यांनी दिला.नायगाव कोळीवाडा येथील साईनाथ मच्छी मार्केटमधील मच्छीमार समाजातील भगिनींनी मोठ्या संख्येने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर बोलताना शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.

देशातील ज्या राज्यांना व्यापक सागरी किनारा लाभला आहे त्यात महाराष्ट्राचा नावलौकीक आहे. या संपूर्ण सागरी किनाऱ्यावर महाराष्ट्रातील, राज्याच्या बाहेरील, तसेच वेळप्रसंगी परदेशातीलदेखील नागरिकांची माशांची गरज भागवण्याची जबाबदारी मच्छीमार समाजातील कुटुंबे घेतात. ज्याप्रमाणे शेतात काम करणारा शेतकरी धान्य पिकवतो, त्याच्यावर लोकांची घरेदारे चालतात तसेच सागरी किनाऱ्यावर राहणारे मच्छीमार आपल्या कष्टांनी, अनेक धोके पत्करून, मासेमारी करुन, लाखो लोकांच्या भुकेचे प्रश्न सोडवतात. त्यामुळे या समाजासंबंधी सामान्य लोकांमध्ये एकप्रकारची आस्था आणि आदर आहे असेही शरद पवार म्हणाले.

चंदू पाटील हे मच्छीमार समाजातील जुनेजाणते कार्यकर्ते आहेत. ते रात्रंदिवस लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मेहनत घेतात. त्यांच्या नेतृत्वाखाली आजचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल शरद पवार यांनी त्यांना  धन्यवाद देतानाच आपण सर्व मिळून एका कुटुंबातील घटक म्हणून काम करू असा विश्वासही दिला.

पक्ष प्रवेश झाल्यानंतर आपण कोळीबांधवांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिक प्रभावीपणे प्रचार करा. जेव्हा – जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला गरज असेल तेव्हा- तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय शरद पवारसाहेब यांच्याविषयी समाजात अधिक चांगलं मत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उपयोग तुम्हाला कसा झाला हे समजावून सांगा. राष्ट्रवादी काँग्रेस हा कार्यकर्त्यांना बळ देणारा, लोकांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे हा मंत्र आणि नेमकं मार्गदर्शन पवारसाहेबांनी आम्हाला केले आहे असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्ष प्रवेशावेळी बोलताना केले.

चंदू पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करत आहात. पक्षाने नेहमीच महिलांना चांगली संधी दिली आहे हे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल जयंत पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पक्षाचे  प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, माजी खासदार आनंद परांजपे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव, प्रदेश युवक उपाध्यक्ष अमोल मातेले, मच्छीमार सेल उपाध्यक्ष विजय वरळीकर, मच्छीमार सेल उपाध्यक्ष प्रदीप टपके, मच्छीमार सेल प्रदेश सरचिटणीस मंगेश कोळी आदीसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.