तेलंगणाच्या सिमेवरील पिंपशेडा आदिवासी गावही आता पक्क्या रस्त्याने जोडले जाणार

नांदेड :- महाराष्ट्राच्या तेलंगणाशी असलेल्या सिमेवर जे गाव आजवर पक्क्या रस्त्याने जोडले नव्हते ते गाव आता जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर पक्क्या रस्त्याने जोडले जाणार आहे. किनवट तालुक्यातील पिंपशेडा हे पूर्णत: आदिवासी गाव कच्च्या रस्त्याने जोडलेले होते. या गावाला तेलंगणातून जावे लागत होते.

याचबरोबर प्रत्येक पावसाळ्यात हे गाव संपर्कापासून तुटल्या जायचे. या आदिवासी बहूल गावाला व येथील आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रवाहात घेता यावे यादृष्टिने जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांना आता वित्त विभागाने नागपूर ते पिंपशेडा रस्ता (व्हिआर 22, एमआरएल 4) दर्जोन्नतीच्या कामास राज्य निधी अंतर्गत मंजुरी देण्यात येत असल्याचे वित्त नियंत्रक तथा उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेऊन जो पाठपुरावा केला त्याबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौतूक केले. आदिवासी बहूल किनवट व इतर तालुक्यातील रस्ते विकासासाठी प्राधान्याने लक्ष देण्यात येत असून सर्वसमावेशक लोकाभिमूख प्रशासनासाठी येणाऱ्या अडचणी मंत्रालयीन पातळीवर सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.