‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसह नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे  आवाहन

जळगाव : अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता व बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) क्षेत्रात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 2 डिसेंबर 2021 पर्यंत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिक, शेतकऱ्यांनी सतर्क राहात सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.

बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल, तर अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. अवकाळी पावसादरम्यान विजा, गारा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. प्रसंगी मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्फॉष्र्मर जवळ थांबू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी  राऊत यांनी केले आहे.