ओबीसी इम्पिरिकल डाटाबाबत जे रिपोर्ट आले आहेत ते थोडे धक्कादायक आहेत – भुजबळ

मुंबई – ओबीसी इम्पिरिकल डाटाबाबत (OBC Imperial Data) वर्तमानपत्रात जे रिपोर्ट आले आहेत ते थोडे धक्कादायक आहेत. आडनावावर जाऊन घरात बसून कोण माहिती घेत असेल तर हे चुकीचे आकडे येतील आणि हे चुकीचे आकडे केवळ या आरक्षणासाठी नाही तर सर्वप्रकारच्या पुढच्या आरक्षणासाठी हा ओबीसींवर फार मोठा अडचणीचा विषय ठरेल ओबीसींची कत्ल होऊन जाईल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबार उपक्रमास छगन भुजबळ उपस्थित होते त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. डाटाबाबत खोलात जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. सॉफ्टवेअर कंपन्यांकडून आऊटसोर्सिगचे जे काम करण्यात आले त्याप्रमाणे त्या सॉफ्टवेअर कंपन्यांना ज्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे त्या काम करत आहेत. कुणी तशा सूचना दिल्या असतील की ही नांवे या समाजाची ही नांवे या समाजाची वगळा तर हे चुकीचे होणार आहे. हे ऐकत आहे. प्रत्येक वेळी सिध्द झाले आहे की ओबीसी समाज ५४ टक्के आहे. पवारसाहेबांनी मंडल आयोग (Mandal Commission) दिला त्यावेळेपासून आहे. पण त्यानंतर २००४ पासून कुणबी मराठा, मराठा कुणबी हे सुद्धा ओबीसीत आले. त्यावेळी अडीचशे जाती होत्या आता सव्वाचारशे जाती झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात ओबीसीमधील जाती कमी होण्याचा संबंध येत नाही उलट वाढतील पण कमी होणार नाही. कारण मराठा समाजात अर्धे कुणबी समाजाचे आहेत. मग प्रश्न असा येतो की आकडे कमी कसे येतात. त्या कंपन्यांना जे सांगितले असेल तर तिथपर्यंत जाणार आहे. तुम्ही मतदारांची जी यादी घेऊन एक ते दोन दिवसात गावात जाऊन ज्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तलाठी आहेत त्यांनी माहिती घ्यायची आहे.

राजकीय आरक्षणासाठी नाही याचा उपयोग पुढे शिक्षण व नोकरी आरक्षणावर याचा फार मोठा परिणाम होणार आहे त्यासाठी याचं योग्य परीक्षण झालं पाहिजे योग्यरितीने डाटा निर्माण झाला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही पत्र दिले आहे असेही छगन भुजबळ म्हणाले. ओबीसी कार्यकर्ते आहेत, संघटना आहेत, नेते आहेत त्यांनी गावागावात जाऊन मतनोंदणी केली जाते तसं ओबीसी डाटा गोळा करत आहेत त्यांच्यासोबत जाऊन हा योग्य डाटा आहे की नाही हे पहावे असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.

विरोधी पक्षनेते बोलतात तेव्हा ते चेक करण्याचे काम यंत्रणांनी पडताळून पहावे. राजकारणातील गोष्टी असत्या तर मी सांगितलं असतं की सोडून द्या परंतु हा ओबीसींच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी केलेले आरोप खरे की खोटे हे यंत्रणांनी पडताळून पहावे असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

पाच टक्के, दहा टक्के ओबीसी आहेत असे सांगितले जात आहे. या मुंबईतील झोपडपट्टीमध्ये उच्चवर्णीय रहात नाहीत. दलित किंवा ओबीसी समाजाचे लोक रहातात. बहुसंख्य मुस्लिम हे ओबीसी आहेत. त्यात थोडे लोक उच्चवर्णीय आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार येथून जे लोक आले आहेत. त्यामध्ये कुशवाह, सैनी आहेत हे कोण आहेत हे सगळे ओबीसी आहेत. त्यांना तुम्ही घेणार नाही असं कसं चालेल. त्यांचे मतदानकार्ड आहे, रेशनकार्ड आहे. सरकारच्या ज्या योजना आहेत त्यातील लाभ घेण्याच्या यादीत त्यांची नांव आहेत. ओबीसीमध्ये का नावे घेणार नाही ती घेतली पाहिजेत. मोठ्या शहरात ओबीसी संख्या पाच आणि दहा टक्के लिहिली जातेय हे तुम्ही जर सांगता ते खरं असेल तर ते धक्कादायक आहे. यामागे काय गौडबंगाल आहे याचे सरकारमधील वरीष्ठांनी शोधून काढले पाहिजे असेही छगन भुजबळ म्हणाले.

पवारसाहेबांचा लोकांमध्ये मिसळण्याचा स्वभाव आहे…

राष्ट्रपती निवडणूकीत (Presidential election) संख्याबळ कमी की जास्त हा मुद्दा महत्त्वाचा नसून त्याहीपेक्षा पवारसाहेबांचा हे राष्ट्रपती पद घ्यायचं आणि त्या भवनात थांबायचं हा त्यांचा मुळचा स्वभाव नाही. त्यांचा लोकांमध्ये मिसळण्याचा, त्यांचा स्वभाव आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्याकडे लोकं येतच असतात आणि ते एका ठिकाणी कधी सापडणार नाहीत. कधी शेतकऱ्यांसोबत तर कधी डॉक्टरांसोबत सतत त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. त्यांना चॉईस आहे की हे काम आवडेल की नाही मात्र वर्तमानपत्रात जे काही आले आहे त्यावरुन पवारसाहेबांनी त्या गोष्टीला साभार नकार दिला आहे असं दिसतं असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या आजीने, वडीलांनी आपल्या देहाची कुर्बानी देशासाठी दिली. त्यांना तुम्ही चौकशीला बोलवता हे मनाला दुःख देणारे आणि क्लेशदायक…

विरोधी पक्षनेत्यांवर धाडी टाकायच्या, आत टाकायच्या हे आता नवीन राहिले नाही. आता राहूल गांधी यांना तीन – तीन दिवस ईडी चौकशीला बोलवत आहे. त्यांच्या पणजोबाने निर्माण केलेली संस्था… त्यांनी देशाला सर्वस्व अर्पण केलं. त्यांच्या आजीने, वडीलांनी आपल्या देहाची कुर्बानी दिली. त्यांना तुम्ही चौकशीला बोलवत आहात. ही संस्था काय तुम्ही निर्माण केली त्या कॉंग्रेसच्या संस्था आहेत. ज्यांच्या पूर्ण खानदानाने देशासाठी जीवन अर्पण केले आहे.पंडीत नेहरु यांनी बारा वर्ष जेलमध्ये काढले. करोडो रुपयांची संपत्ती असताना त्यांचे वडील श्रीमंतापैकी एक होते. बंगले अर्पण केले… देशासाठी ज्यांनी देह अर्पण केले त्यांच्या चौकशा केल्या जात आहे. हे मनाला दु:ख देणारे व क्लेशदायक आहे अशी खंतही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री यांचे बोलण्याच्या यादीत नाव नाही हे चुकीचेच आहे…

देहू येथील कार्यक्रमाला राज्याच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)उपस्थित होते. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते यांना बोलायला संधी देता आणि राज्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री यांचे बोलण्याच्या यादीत नाव नाही हे चुकीचेच आहे. पंतप्रधानांनी विचारले तो त्यांचा मोठेपणा आहे परंतु अजितदादा पवार यांना माहीत होते की, यादीत नावच नाही तर ते बोलतील कसे असेही छगन भुजबळ म्हणाले.

राज्यपालांनी मंत्र्यांना बोलवायचं नाही आणि एका पक्षाच्या लोकांना बोलवायचं हा काय प्रकार आहे…

काल (मंगळवारी) राजभवनमध्ये राज्यसरकारचा कार्यक्रम होता. त्यात दोन – चार मंत्र्यांना बोलावलं होतं. बाकी मंत्र्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. राज्याचा कार्यक्रम…राजभवनमध्ये होतो. बाकीचे अनेक लोक होते. याबाबत विचारणा केली त्यावेळी विचारुन सांगतो असे राजभवन कार्यालयाकडून सांगण्यात आले मात्र त्यानंतर कॉल काही आला नाही. ही काय पध्दत आहे. हा कसला प्रोटोकॉल आहे. राज्यपालांनी मंत्र्यांना बोलवायचं नाही आणि एका पक्षाच्या लोकांना बोलवायचं हा काय प्रकार आहे अशा शब्दात छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.