रिपब्लिकन पक्ष : राष्ट्रीय राजकारणातील उगवता सूर्य

प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Babasaheb Ambedkar)संकल्पनेतून साकार झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना दि.3 ऑक्टोबर 1957 रोजी करण्यात आली. यंदा रिपब्लिकन पक्षाला 65 वर्षे पूर्ण होत असून दि.3 ऑक्टोबर 2022 रोजी रिपाइं चा 66 वा वर्धापन दिन आहे.त्यानिमित्त रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपाइं च्या काल आज आणि उद्या या तिन्ही काळाचा घेतलेला आढावा या लेखात मांडला आहे.

जगातील सर्वात श्रेष्ठ ठरलेल्या भारतीय संविधानाची रचना ज्यांनी केली त्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची संकल्पना मांडली. भारतीय जनतेला खुले पत्र लिहून त्यांनी रिपब्लिकन पक्षाची संपूर्ण संकल्पना मांडली. रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची तीव्र ईच्छा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची होती मात्र ती पूर्ण करण्या आधी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर त्यांची संकल्पना त्यांचे स्वप्न असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना आंबेडकरी अनुयायांनी तत्कालीन नेत्यांनी मिळून दि. 3 ऑक्टोबर 1957 रोजी केली. आपल्या प्राणप्रिय उध्दारकर्त्याने मांडलेली रिपब्लिकन पक्षाची संकल्पना आंबेडकरी अनुयायांनी साकार केली.त्याला आता दि 3 ऑक्टोबर ला 65 वर्षे पूर्ण होऊन 66 वा वर्धापन दिन सच्चे आंबेडकरी अनुयायी साजरा करतील. ज्यांनी भारतीय संविधान लिहिले..ज्यांच्या प्रखर प्रज्ञेची बुद्धीची ज्ञानाची विद्वत्तेची संपूर्ण विश्वात पूजा केली जाते त्या महमानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही महान संकल्पना आहे. त्याचा आम्हा प्रत्येक भीमसैनिकाला अभिमान वाटला पाहिजे. त्याच अभिमानामुळे आम्ही दरवर्षी 3 ऑक्टोबर ला रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिन साजरा करतो. यंदा ही आम्ही रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन भुसावळ ( जिल्हा जळगाव) येथे साजरा करीत आहोत.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना म्हणून आम्हाला रिपब्लिकन पक्षाचा अभिमान आहे. आम्ही गर्वाने मी रिपब्लिकन तू रिपब्लिकन आम्ही रिपब्लिकन चा नारा देशभर देत आहोत. हे सांगण्याचे कारण म्हणजे मागील 65 वर्षांच्या इतिहासात रिपब्लिकन पक्षाची वाटचाल पहिली तर गटतट फुटीचा शाप असणारी चळवळ म्हणजे रिपब्लिकन पक्ष ठरला आहे. त्यामुळे रिपब्लिकन चळवळीला गटबाजी चा पक्ष म्हणून बदनामीला सामोरे जावे लागले. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळ बदनाम करण्यात आली की काही नेत्यांनी आपल्या पक्षाला आपल्या गटाला रिपब्लिकन नाव देणे बंद केले. काही लोकांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष नावाला मूठमाती देऊन वंचित नाव धारण केले.अनेक गट रिपब्लिकन ऐवजी बहुजन संज्ञा घेऊन राजकारण करीत आहेत. आम्हाला मात्र कधीही रिपब्लिकन संज्ञेमागील प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांचा विसर पडला नाही. ज्या महामानवामुळे आपली शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट झाली.ज्या महामानवाच्या प्रखर तेजस्वी बुद्धी ज्ञान संपदेमुळे भारतीय संविधान साकार होऊन लोकशाही मजबूत उभी आहे.भारताचा भाग्यविधाता ठरेलल्या त्या महामानवाच्या संकल्पनेला कोणी त्याज्य कसे मानू शकते?.उलट रिपब्लिकन ही संकल्पना अत्यन्त व्यापक आणि राष्ट्रहित साधणारी संकल्पना आहे. भारतीय संविधानाची उद्दिष्ट्ये समता स्वातंत्र्य बंधुता समाजीक न्याय राष्ट्रीय एकता आणि सर्वधर्मसमभाव या संविधानिक मूल्यांची बांधणी असणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक व्यापक पक्ष आहे. या पक्षाचा ; रिपब्लिकन संकल्पनेचा अभिमान म्हणून गर्व से कहो हम रिपब्लिकन है चा नारा आम्ही देशात दिला आहे.

दि.3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्या नंतर रिपाइं चे देशभरातून 9 खासदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.अनेक राज्यांत आमदार निवडून आले होते.उत्तर प्रदेशात एक मंत्री ही राज्यसरकार मध्ये होते. 9 खासदार निवडून आल्यानंतर निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या कमी कमी होत राहिली. प्रत्येक निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीची संख्या कमी होत राहिली मात्र त्याचवेळी रिपब्लिकन पक्षाच्या गटातटांची संख्या वाढत राहिली. त्यामुळे सत्ते पासून रिपब्लिकन पक्ष दूर राहिला.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या काळात देशात काँग्रेस आणि नंतर भाजप हे प्रमुख पक्ष सत्तेत राहिले. काही काळ जनता दल सत्तेत होते.नंतर काळात नवनवे पक्ष स्थापन होत राहिले. जुन्या राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस तग धरून आहे.मात्र जनता दल; कम्युनिस्ट पक्ष ; महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष शेजार च्या गोवा राज्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष असे काही पक्ष आणि चळवळ कमजोर होत राहिली. संपत चालल्या आहेत. त्यात रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन चळवळ संपणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागला.त्यांना परखड उत्तर देण्यासाठी दरवर्षी दि.3 ऑक्टोबरला आंबेडकरी जनता रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन देशभर साजरा करते. रिपब्लिकन ऐक्य व्हावे ही आंबेडकरी जनतेची ईच्छा आहे. 1998 मध्ये रिपब्लिकन ऐक्य असताना रिपाइं चे 4 खासदार लोकसभेत निवडून गेले होते.उगवता सूर्य ही रिपब्लिकन पक्षाला निवडणूक निशाणी मिळाली होती.रिपाइं चा उगवता सूर्य आम्हाला पुन्हा मिळवायचे आहे.

रिपब्लिकन ऐक्याची अनेकदा शकले झाल्यामुळे आता रिपब्लिकन नेत्यांचे ऐक्य व्हावे याबाबत ची आंबेडकरी जनतेत ईच्छा कमी होत आहे.मात्र महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शासनकर्ती जमात व्हा हा संदेश साकार होऊन रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि देशाच्या संसदेवर फडकला पाहिजे. ही आंबेडकरी जनतेची ईच्छा तीव्र आहे. त्यासाठी कोणत्यातरी एका नेत्याची गटाची निवड करून त्याच निळ्या झेंड्याखाली सर्व आंबेडकरी जनतेने एकत्र आले पाहिजे.समाजाचे ऐक्य झाले पाहिजे. उठसुठ गट काढणे थांबवले गेले पाहिजे. रिपब्लिकन ऐक्य झाले तर राज्यातील 6 टक्के बौद्ध आंबेडकरी जनतेचे ऐक्य होते. त्या बळावर राज्याची सत्ता मिळवता येत नाही. आता स्वबळावर सत्ता मिळविणे कोणत्याही एका पक्षाला शक्य नाही. युती आघाडीतून सत्ता मिळविता येऊ शकते. त्यामुळे राज्यातील 6 टक्के बौद्ध आंबेडकरी जनता रिपब्लिकन पक्षासोबत अली तर 6 टक्के बौद्धांच्या एकजुटीच्या ताकदीला अनुसूचित जाती जमाती च्या अन्य जाती; ओबीसी वर्ग; सवर्ण मराठा ब्राह्मण मधील आर्थिक दुर्बल घटक; मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्यांक यांचा रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा मिळाला तर देशात राष्ट्रीय राजकारणात रिपब्लिकन पक्ष मावळता नाही तर उगवता सूर्य ठरू शकतो. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षावर जीवापाड प्रेम करणारा कार्यकर्ता वर्ग देशात तयार झाला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग सर्व जाती धर्मांमध्ये असून ते सर्व आंबेडकरी अनुयायी रिपब्लिकन पक्षाला ताकद देत आहेत. तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये रिपब्लिकन चळवळीचे बळ वाढत आहे.पश्चिम बंगाल; उत्तर प्रदेश ; गुजरात दिल्ली हरयाणा या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्ष चांगला वाढत आहे. आसाम मणिपूर सह संपूर्ण ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे. मणिपूर विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार केवळ 183 मतांनी पराभूत झाला पोस्टल मतांमध्ये रिपाइं उमेदवाराचा पराभव झाला. अन्यथा याच निवडणुकीत मणिपूर विधानसभेत रिपब्लिकन पक्षाने खाते उघडले असते.पूढील विधानसभा निवडणुकीत आसाम ; मणिपूर;कर्नाटक; तामिळनाडू; गुजरात; उत्तर प्रदेश;छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे.

2016 साली मी भारत भीम यात्रा काढून रिपब्लिकन पक्षाची देशभरातील ताकद दाखवून रिपाइं कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित केला होता.1990 मध्ये माझे प्राणप्रिय संघटन भारतीय दलित पँथर मी रिपब्लिकन ऐक्यात विसर्जित केले होते. तेंव्हापासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष संपूर्ण देशात कसा मजबूत उभा राहील यासाठी काम करीत आहे. येत्या काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देशभरात रिपब्लिकन पक्ष आपले अस्तित्व सिद्ध करून राष्ट्रीय राजकारणातील उगवता सूर्य ठरेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील व्यापक प्रबळ रिपब्लिकन पक्ष साकार करण्याचा निर्धार रिपाइं च्या 66व्या वर्धापन दिनी करूया. देशात उभ्या राहिलेल्या चळवळी आणि पक्ष संपले तरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची चळवळ आणि रिपब्लिकन पक्ष कधीही संपणार नाही. आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव राजकीय पटलावरून कधीही मिटू देणार नाही हाच आमचा संकल्प आहे. जय भीम ! – रामदास आठवले(केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार)(Ramdas Athawale (Union Minister of State Government of India).