त्रिसदस्यीय प्रभाग रचनेस रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध – रामदास आठवले

मुंबई : मुंबई महापालिका वगळता इतर सर्व महापालिकांमध्ये महाविकास आघाडी सरकारने त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू करण्याचा घेतलेला निर्णय लोकशाही विरोधी आहे. छोट्या पक्षांना त्यांच्या उमेदवारांना निवडणूक लढण्याची समान संधी ला हरताळ फासणारा निर्णय आहे. त्यामुळे नगरपालिका असो की महापालिका राज्यात सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एक प्रभाग एक सदस्य अशीच प्रभाग रचना ठेऊन निवडणूक घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

मुंबई शिवाय अन्य महापालिकांमध्ये एक प्रभाग तीन सदस्य ही रचना अत्यंत चूक आहे. नगरपालिका नगर परिषद; महापालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक प्रभाग एक सदस्य अशीच रचना असावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत एक प्रभाग एक सदस्य अशी रचना असून हीच पद्धत योग्य आहे.

एका प्रभागाच्या निवडणुकीत एका मतदाराला तीन तीन जणांना मत देण्यास लावणे चूक आहे.एक प्रभाग तीन सदस्य या रचनेस रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असून या निर्णयाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनर्विचार करावा अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्याबाबत चे पत्र आपण मुख्यमंत्र्यांनी लवकर पाठविणार आहोत असे रामदास आठवले यांनी संगितले.

हे वाचलंत का ?