वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत १७ वाड्यांचा समावेश करण्यात आला असून येत्या ३० वर्षातील या भागातील पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे या योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जल जीवन मोहिमेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत वारूळवाडी भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार रविंद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच ज्योती संते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे आजार होतात. याचा विचार करता ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याकरीता ७० हजार कोटीची ‘हर घर जल’ योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळजोडणी देण्यात येणार आहे. वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी ४७ कोटी ४८ लक्ष ८७ हजार ७२६ रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये सन २०५४ पर्यंत लोकसंख्येचा विचार करुन प्रत्येक नागरिकाला ५५ लिटर दर दिवशी शुद्ध पाणी देण्याबाबत नियोजन करण्यात आले. यामध्ये जुन्या पाईपसोबत नवीन पाईप लाईनचे काम करण्यात येणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेद्वारे १२ हजार नागरिकांना पाणी
वारुळवाडी पाणी पुरवठा योजनेमध्ये ठाकरवाडी, गणपीरबाबा वस्ती, कोल्हेमळा, कळमजाई ठाकरवाडी, मळावाडी, शहाणे-रेपाळे वस्ती, ढेरेमळा, काडळेवस्ती, चिमणवस्ती, केदारवस्ती, वारुलेमळा, जाधव-काडले वस्ती, मेहेरमळा, कानडे-वारुले वस्ती, आनंदवाडी, वळणवाडी, नुंबरवाडीवाडी या वाड्यांच्या समावेश करण्यात आलेला आहे. योजनेअंतर्गत १२ हजार ४१० नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साठवण टाक्या, आरसीसी जॅकवेल, ब्रीज, जलसुद्धीकरण केंद्र, शुद्धपाणी पंपीग यंत्रणा, आदी कामे करण्यात येणार आहेत.सदरची योजना ३० महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.