गणपत आबांच्या सांगोल्यावर आता राष्ट्रवादीचा डोळा; राष्ट्रवादीचा प्रभाव वाढवण्याचे प्रदेशाध्यक्षांचे निर्देश 

सोलापूर –   गणपतराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचे काम अनेक वर्षे या सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादीने केले आहे.त्यांनी तपस्वी काम केले आहे मात्र त्यांच्यानंतर आता या मतदारसंघात अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

गणपतआबा देशमुख यांनी वर्षांनुवर्षे या सांगोल्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. या दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवावे यासाठी आबांनी प्रयत्न केला. कालांतराने या भागात टेंभूचे पाणी आले, म्हैसाळचे पाणी आले. आज आबा हयात नाहीत मात्र दिपकआबा साळुंके या भागात अधिकचे पाणी यावे यासाठी प्रयत्नशील राहतात. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो. सांगोल्याच्या सर्व गावांना पाणी मिळावे अशी त्यांची मागणी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात  या भागासाठी विशेष बैठक घेतली जाईल व या भागातील जास्तीत जास्त मागण्या दिपक आबांच्या उपस्थितीत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.

२०२४ च्या निवडणुकीसाठी आपण सज्ज रहायला हवे, त्यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे आणि म्हणून बुथवर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक बुथवर राष्ट्रवादी प्लसमध्ये पाहिजे, जर आपण मायनसमध्ये जात असाल तर का मायनसमध्ये जातोय याचा अभ्यास करण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

आदरणीय पवारसाहेबांच्या प्रत्येक निर्णयाला आपण पाठिंबा दिला आहे. यापुढेही द्याल याची मला खात्री आहे. दिपकआबा यांनी राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवली आहे. या मतदारसंघात बदल घडवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

आपण पक्ष संघटना किती गांभीर्याने घेता याचा आढावा या संवाद यात्रेत घेत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सांगोला तालुक्यातील जास्त गावे पाण्याखाली आली पाहिजे यासाठी दिपकआबा साळुंखे यांनी सांगितल्यावर प्रयत्न करतोय. नादुरुस्त बंधारे दुरुस्तीलाही मान्यता दिली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.