पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे,त्यांनी आता वाट न पाहता… : खडसे

मुंबई – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. यात एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

दरम्यान, या मंत्रिमंडळात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा समावेश होईल अशी चर्चा होती मात्र तसे काही घडले नाही. यावर पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी भाष्य केले आहे. वरीष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रीपद दिलं नसेल असं त्या म्हणाल्या. ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असतं त्यावेळेस सर्वांना समाधानी करणं शक्य नसतं. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांचा समाधान करावं अशा शुभेच्छा मी नव्या मंत्र्यांना देऊन झालेली आहेत. असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले,मंत्रीमंडळ विस्तार अपूर्ण दिसत आहे. पुढील काळात तो पूर्ण होईल अशी आशा आहे. पण अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर सातत्याने अन्याय केल्याचं दिसत आहे. यामध्ये पंकजा मुंडेही आहेत. आताही पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडेंनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला आहे.