‘बेवड्यांना समर्पित असं हे सरकार’, दरेकरांनी ठाकरे सरकारला घेतलं फैलावर

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. दरम्यान ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

भरकटलेल्या सरकारला भरकटलेला निर्णय. सरकारला शेतकऱ्यांची नाही तर दारुड्यांची काळजी आहे. उद्याजी पिढी बर्बाद होईल, याचं या सरकारला काहीही देणंघेणं नाही. बेवड्यांना समर्पित असं हे सरकार आहे. यांना मंदिराची, शिक्षण किंवा शिक्षकांची काळजी नाही. पण दारु विक्रेत्यांची काळजी हे सरकार घेत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलीय.