हे केवळ शिवसेनेचे नव्हे, तर महाविकास आघाडीचे सरकार आहे; शिवसेनेची बाजू सावरण्याचा देसाईंचा प्रयत्न

मुंबई – जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे(Hanuman Chalisa)  पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे(MNS chief Raj Thackeray)  यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे, असं म्हटलं आहे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद(The strength of Hindus)  दाखवून द्या, असा आदेश राज यांनी दिला.

राज ठाकरे यांनी बुधवारपासून भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पत्र प्रसारित केले असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. यातच आता काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक (new video on Twitter) नवा व्हिडिओ शेअर केला आहे. राज ठाकरे यांनी शेअर केलेला व्हिडिओ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा आहे. या भाषणात बाळासाहेब मशिदींवरील भोंग्यांच्या बाबत आपली भूमिका मांडताना दिसत आहेत.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला  पत्रकार हेमंत देसाई यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे. देसाई म्हणतात, रस्त्यावरील नमाज आणि मशिदीवरील भोंगे वगैरे आमचे सरकार आल्यावर थांबवू, असे एका भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी तसा व्हिडीओच रिलीज केला आहे. परंतु हे केवळ शिवसेनेचे नव्हे, तर महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय आणि घटना यांना शिरोधार्य मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटचाल करायची आहे.

ज्यावेळी वाजपेयी सरकार होते, तेव्हा आघाडी सरकार असल्यामुळे 370 कलम, राम मंदिर वगैरे मुद्दे त्यांना बाजूला ठेवावे लागले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांचे विचार काहीही असले, तरी घटनेप्रमाणे कारभार करणे हे उद्धवजींचे कर्तव्य आहे. कारण ते आज घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव घेऊन उद्धवजींना कोंडीत पकडण्याचा आनंद ज्यांना घ्यायचा आहे, त्यांनी तो जरूर घ्यावा, परंतु मुख्यमंत्र्यांना मात्र आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या विसरून चालणार नाही आणि सुदैवाने त्याचे भान त्यांना आहे! असं म्हणत शिवसेनेची बाजू सावरण्याचा देसाई यांनी प्रयत्न केला आहे.