महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झालंय – नाना पटोले

मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली असून मंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झाले आहे. काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली पण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियानाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जाणार असून यावेळी ‘जेलभरो’ आंदोलनही केले जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

टिळक भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, या बैठकीत संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. देशात व राज्यात भाजपाने चालवलेल्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड संताप व चिड आहे. भाजप जाती धर्मांत फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजत आहे. काँग्रेस सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे.

राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा जनाधार मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये चौथ्या क्रमांकावरून पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर आला आहे. या कामगिरीत सातत्य ठेवून पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देणे व सोनियाजी व राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिल्ह्या–जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पटोलेंनी केले.

हे ही पहा: