शिंदेंनी सत्ता मिळविली असली तरी महाराष्ट्राचे मन, हृदय जिंकलेले नाही – ममता बॅनर्जी

मुंबई – राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली. दरम्यान, आता सत्तेचे सर्व सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर आता चांगलेच कामाला लागले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर आमदारांना पैशांशिवाय आणखीही काही देण्यात आले असा गौप्यस्फोट तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार बेकायदा आहे . त्यांच्या सरकारने सत्ता मिळविली असली तरी महाराष्ट्राचे मन , हृदय जिंकलेले नाही , असा घणाघात ममता बॅनर्जी यांनी केला .

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील हॉटेलमध्ये लक्झरी लाइफ (Laxury Life)  एन्जॉय केली. त्यासाठी पैसा कोठून आला ? या बंडखोर आमदारांना केवळ पैसाच पुरविला गेला नाही तर आणखीही बरेच काही दिले गेले आहे. या सर्व गोष्टी कोठून आल्या ? असा खडा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला.

ममता बॅनर्जी यांनी भाजप (BJP) आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाहीवरच बुलडोझर फिरविला जात आहे. मात्र पुढील निवडणुकीत भाजपसाठी जनताच बुलडोझर (Bulldozer) बनेल. देशभरातील जनता भाजप नको म्हणून मतदान करेल असा विश्वासही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.