कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

पुणे  –कात्रज नवीन बोगद्यातील (Katraj New Tunnel) साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत तसेच २३ मार्च रोजी रात्री ११ ते २४ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

या कालावधीत सदर रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ही नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्याची साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.