‘दोन शिवसैनिकांचे खून झाले, तानाजी सावंत फिरकलेच नाहीत’

मोहोळ – मोहोळ येथे शिवसेनेसाठी लढणाऱ्या सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोन दलित शिवसैनिकांचे खून झाले, त्या विरोधात मोहोळ तालुक्यातील शिवसैनिक हतबल होऊन लढत होता आजही न्यायासाठी सदर पिडीत कुटुंबीय  धडपड करत आहेत, संपर्क प्रमुख म्हणून तानाजी सावंत यांनी त्यांच्यासाठी काय केले? ते एकदाही फिरकले नाहीत,  पक्ष नेतृत्वापर्यंत त्यांनी वेदनाच पोहोचवली नाही, ना कुठली मदत केली ना कुठला आधार दिला, उलट काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना फक्त पैश्याच्या जोरावर झुंडशाही करून त्यांचा आवाज दाबत नेऊन  रेटण्याचे काम सुरू आहे, असे मत शिवसेनेचे नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले.

याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना नागेश वनकळसे म्हणाले की शिवसेनेचा आत्मा शिवसैनिक आहे,आम्ही सर्व जण शिवसैनिक म्हणून काम करताना काय अडचणी येतात हे कधीच सावंत यांनी विचारले नाही फक्त पदाधिकारी बदलणार एवढीच भाषा त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते, सावंत सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र असून कुटुंब प्रमुख म्हणून कधीच त्यांनी विचारपूस केली नाही उलट त्यांची वाहवा जे करतात,त्यांच्या  जे मागे पुढे  करतात त्यांनाच त्यांनी जवळ केले ,जे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानून जे शिवसैनिक  स्वाभिमानाने  काम करतात त्यांच्यावर ते डाव धरतात, त्यांचे बंधू समनवयक  शिवाजीराव सावंत जे सांगतील त्या प्रमाणे खाली व्यक्तिद्वेषाची यंत्रणा काम करते, उलट त्यांच्यापासून मातोश्रीला मानणाऱ्या शिवसैनिकांच्या जीवाला सावंतापासून धोका आहे, त्यांच्या सोबतच्या लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्या जीवावर सावंत परत सेनेत गटबाजी करून, दुफळी निर्माण करत आहेत असे यावेळी वनकळसे म्हणाले.

सावंत यांच्या हेकेखोर पणामुळे करमाळ्याचे नारायण पाटील ,सोलापूरचे महेश  कोठे हे आमदार  होणारे ताकतीचे  उमेदवार पण त्यांना डावलले, त्यांच्या हातात सर्व काही होते परंतु त्यांची विधानसभेच्या तिकिटासाठी केलेली होलपट  संपूर्ण जिल्हा पहात होता, आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या समर्थकांना संधी देण्यासाठी त्यांची सगळी उठाठेव सुरू आहे, सावंत यांच्या त्रासाने परिसीमा ओलांडली असून त्या विरोधात प्रचंड असंतोष आहे, त्यांच्या पासून जिल्ह्याची  मुक्तता व्हावी अविरत रक्तदानाची मोहीम हाती घेत असल्याचे नागेश वनकळसे म्हणाले.