उद्धव ठाकरे तुमच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा सवाल

पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहेत. या वादग्रस्त मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक होत आधी पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि नंतर पुन्हा मुंबईत झालेल्या सभांमधून तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा (Ayodhya), त्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी स्थगित केलेला दौरा या सगळ्याच मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली.

यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सभेत औरंगाबादला संभाजीनगर करायची गरजच काय, असे म्हटलं होतं. त्यावरुन, उद्धव ठाकरेंना फटकारले. तुम्ही कोण, तुम्ही सरदार वल्लभाई पटेल आहात की, महात्मा गांधी, असा सवाल राज यांनी विचारला. तसेच, राज ठाकरेंचं एकतरी आंदोलन फेल झाले का, सगळी आंदोलने पूर्णत्वाला नेली आहेत. माझा उद्धव ठाकरेंना एक सवाल आहे. तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का?. मग ती मराठीच्या मुद्द्यावर असेल किंवा हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर असेल, असे म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला.

पुढे ते म्हणाले, काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं.