‘मोठ्या मनाची साधं माणसं शिवसेनेसोबत आहेत तोपर्यंत शिवसेना कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’

मुंबई – विधिमंडळातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्के देणे सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात जात आहेत. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, सध्या महापालिका, नगरपालिका अस्तित्वात नाही. त्यांची लोकं असतील ती गेली असतील. माझ्या निष्ठावंताना खाली बसवून त्यांना उमेदवारी दिली होती. ते गेले, असं ठाकरे म्हणाले.

मला शिवसैनिक (Shiv Sainik) रोज भेटत आहे. ज्यांचं तळहातावर पोट आहेत, अशी साधं लोक येऊन रडत आहे. शिवसेनेने आजपर्यंत साध्या-साध्या माणसांना मोठं केले, हा अभिमानाचा विषय आहे. साध्या लोकांच्या मेहनतीने ज्यांना मोठेपण मिळालं, ती गेली. पण मोठ्या मनाची साधं माणसं शिवसेनेसोबत आहेत. तोपर्यंत शिवसेना कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.