‘या’ मुद्यांवरुन बाजूला हटण्यास शिंदे तयार नसल्याने उध्दव ठाकरे यांची अडचण वाढली

मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग घिरट्या घालत आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने ४८ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतहून गुवाहाटीला गेले आहेत. गुवाहाटीमध्ये शिवसेनेचे ४१ आमदार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राजकीय संकटाच्या काळात भाजप (BJP) पुढील रणनीतीवर वेगाने काम करत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात नव्या समीकरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान,  या बंडाची सुरवात ज्या एकनाथ शिंदेंनी सुरु केली ते अजूनही आपल्या मुद्यांवर ठाम आहेत. यापुढे हिंदुत्वाला घेऊनच पक्षाची वाटचाल ही झाली पाहिजे शिवाय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या बरोबर सत्ता नको. या पक्षामुळेचे शिवसेनेचे नुकसान झाले असून यामुळे आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे हिंदुत्व आणि या दोन पक्षाला सोडून जो कोणता निर्णय असेल तो मान्य असे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. या मुद्यांवरुन बाजूला हटण्यास एकनाथ शिंदे हे तयार नसल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची अडचण अधिक वाढली आहे.

एका आमदाराच्या निधनामुळे महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या सध्या २८७ आहे. अशा स्थितीत बहुमतासाठी 144 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला (MVA) राज्यातील १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर विरोधकांकडे एकूण 113 आमदार आहेत. त्यात भाजपचे 106, आरएसपीचे 1, जेएसएसचे 1 आणि 5 अपक्ष आमदार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या ३७ समर्थक आमदारांनी भाजपशी हातमिळवणी केली तर ठाकरे सरकार अल्पमतात येईल. मात्र, एकनाथ शिंदे भाजपसोबत जातात की स्वबळावर गटबाजी करून वर्चस्व कायम ठेवतात , हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.