‘आपले रक्त पिऊन हे ढेकूण मोठे झाले आहेत, निवडणुकीत मतदानाच्या बोटाने त्यांना चिरडून टाका’ 

Khed – आपले रक्त पिऊन हे ढेकूण मोठे झाले आहेत. निवडणुकीत मतदानाच्या बोटाने त्यांना चिरडून टाका असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनी खेडमधील सभेतून आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमची वंशावळ कुठली, असा सवाल देखील ठाकरे  यांनी यावेळी केला.

खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त येथील गोळीबार मैदानावर आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले,  मराठी माणसाचा आवाज आणि भगवे तेज संपवून टाकण्याचे काम हे लोक करत आहेत. त्यांच्या दृष्टीने विरोधी पक्ष पापी, गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी. पण यांपैकी सर्वात जास्त लोक तुमच्याकडेच आहेत. आज आमचे आमदार राजन साळवी, वैभव नाईक यांच्या मागे चौकशी लावून छळ चालू आहे. पण उद्या दिवस फिरले तर तुमच्या घरा-दाराची काय हालत होईल, याचाही विचार करा. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.