केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उदय सामंत यांना दिले ‘हे’ वचन

नवी दिल्ली : कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरास जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड या रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतून आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली.

राज्याच्या आणि कोकणच्या विविध विकासात्मक विषयांसंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय वाहतून आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी, निवळी – जयगड रस्त्याच्या कामाची पूर्तता लवकरच होणार असल्याचे वचन गडकरी यांनी उदय सामंत यांना दिले.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, निवळी – जयगड रस्त्याचा प्रस्ताव पाठीमागे झालेल्या बैठकीत सादर करण्यास सांगितले होते. आज याबाबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून निवळी-जयगड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून हा रस्ता चौपदरी झाल्यामुळे या भागातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

सामंत म्हणाले, निवळी – जयगड रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास अपघाताचे प्रमाण कमी होणार असून वाहतूक कोंडीस आळा बसणार आहे. बंदराला रस्ते वाहतूकीने जोडण्यासाठी हा रस्ता महत्वपूर्ण आहे.