भाजपला समाजात पुन्हा वर्ण व्यवस्था आणि जातीभेद आणायचा आहे – नवाब मलिक

मुंबई – आज कुठेतरी लोकशाहीचा दुरूपयोग करुन लोकशाहीला मारक भूमिका स्वीकारली जात आहे. जातीपातीच्या नावावर अन्याय होत आहे. धर्माच्या नावावर लिचिंग करण्याचे काम होत आहे. घटनाविरोधी परिस्थिती निर्माण करुन काही राजकीय लोकं आजच्या घडीला देशातील धर्मनिरपेक्षता धोक्यात आणत आहेत असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल व्यक्त केले.

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संविधान गौरव दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवाब मलिक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

भारत एक लोकतांत्रिक, समाजवादी धर्मनिरपेक्ष देश राहील अशी राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी सुपूर्द केली. घटनेमध्ये घटना दुरुस्ती करून घटनात्मक बदल करता येतो. घटनात्मक बदल करण्याचे अधिकार सरकारला आहे.मात्र मूळ घटनेत बदल होऊ शकत नाही असे आपल्या राज्यघटनेत नमूद आहे याची आठवण नवाब मलिक यांनी केंद्रसरकारला यावेळी करून दिली .

आपल्यासोबत अनेक देश स्वतंत्र झाले पण त्या देशात लोकशाही टिकून राहिली नाही. आपल्या राज्यघटनेमुळे आपल्या देशातील लोकशाही अबाधित आहे हे नाकारता येत नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत. या देशाचे शासक मालक नसतात तर ते सेवक असतात.देशाला चालवण्यासाठी यंत्रणा ही या देशातील जनता निवडते. ही आपल्या राज्यघटनेची ताकद आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

घटनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिक विषमता दूर करण्याचे काम सरकारचे आहे. परंतु आज ११ टक्के लोकांकडे देशाची ९० टक्के संपत्ती आहे तर ९० टक्के लोकांकडे १० टक्के संपत्ती आहे, अशी आर्थिक विषमता देशात पाहायला मिळते आहे. हा समतेवर आधारीत समाज होऊ शकत नाही. या देशात जी धोरणे तयार होतात त्यातून श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होईल या उद्देशाने होतात अशी टीकाही नवाब मलिक यांनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही विकणारी लोकं आहेत तर अदानी आणि अंबानी हे खरेदी करणारे आहेत. समतावादी समाज हे आपल्या राज्यघटनेतील मूल तत्त्व आहे. त्याला तडा देण्याचे काम केंद्रसरकार करत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

राईट टू डिसिजनचा हक्क आपल्याला राज्यघटनेने दिला आहे. जे जनतेला मान्य नसेल तर सरकारच्या विरोधी भूमिका घेण्याचा अधिकार आहे. अशी भूमिका घेतल्यानंतर सरकारला दोन पावले मागे हटण्याशिवाय पर्याय राहत नाही. हे देशातील शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले याची आठवणही राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांबाबत बोलताना नवाब मलिक यांनी करून दिली.

भाजपाचा राष्ट्रवाद म्हणजे मनूवादी भूमिका जाहीर करणारा आहे. त्यांना समाजात पुन्हा वर्ण व्यवस्था आणि जातीभेद आणायचा आहे. हा बोगस राष्ट्रवाद असून तो कधीच आम्ही मान्य करणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली.

भारत एक धर्मनिरपेक्ष, समाजवादी लोकतांत्रिक व्यवस्था निर्माण करणारा देश राहिल हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रवाद आहे. आपला राष्ट्रवाद हा राज्यघटनेला बांधिल असणारा आहे. त्या राष्ट्रवादासाठी आपल्याला लढा दयायचा आहे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले.

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सुनिल शिंदे, मुंबई विभागीय महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, मुंबई विभागीय युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.