आघाडीत बिघाडी : शिवसेनेच्या वाघांनी सुरु केली आरपारच्या लढाईची तयारी

रायगड – रायगडमध्ये (Raigad) शिवसेनेच्या तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या असलेल्या पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. त्यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरुन हटवा, अशी मागणीच केली आहे.

विशेष म्हणजे याच मागणीसाठी आज शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची आलिबागमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे तीनही आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या मागणीबाबत पत्र लिहितील, त्यानंतर प्रत्यक्ष भेटतील, अशी माहिती समोर आली आहे.

तटकरे या विकासकामांच्या निधी वाटपात भेदभाव करीत आहेत, तसेच प्रत्येक विकासकामात श्रेय घेत असल्याचा आरोप आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. त्यामुळे आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरुन पायउतार करण्यात यावे, अशी मागणी या तीनही आमदारांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.