‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये वच्छीची धमाकेदार एन्ट्री

पुणे : झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वानेदेखील प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय.

कारण दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहेत. नाईकांच्या वाडयातल्या शुभ कार्यापासून मालिका वाड्यात वावरणाऱ्या अण्णा शेवंतांच्या अतृप्त आत्म्यापर्यंत कथा येऊन पाहोचली आहे. माईने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी वाडा शेवंतांच्या ताब्यात दिला असला तरी वाड्याबद्दल असलेली तिची आपुलकी आणि मुलांवर असलेला जिव्हाळा यामुळे माईचे प्रयत्न नक्कीच थांबणार नाहीत.

माईची पुण्याई तिच्यासोबत असली तरी हवी एक अशी व्यक्ती जी या दुष्ट शक्तीवर अंकुश ठेवेल. कोण असेल ही व्यक्ती? असा अंदाज बांधत असाल तर ही व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे आणि हे तुमचं लाडकं पात्र आहे. हे पत्रा आहे वच्छी. होय, ‘वच्छी परत येतेय’.

वाड्याचा जिला हव्यास होता ती वच्छी नेमकं काय करणार, खरंच माईच्या पाठीशी उभी राहणार का, शोभा, काशीच्या मृत्यूचा सूड घेणार का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं घेऊन वच्छी परत येतेय. मालिकेतील आगामी भागात प्रेक्षकांना वच्छीच्या येण्याने एक रंजक वळण पाहायला मिळेल. रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.