झेंडा बदलण्याच्या मुद्द्यावरून विश्वंभर चौधरी सरकारवर बरसले, म्हणाले, दिल्लीच्या साहेबांना …
मुंबई – भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. पण नौदलाच्या ध्वजात ब्रिटिशांच्या राजवटीतील खुणा तशाच होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पारतंत्र्याची प्रत्येक ओळख पुसली जावी, हा संकल्प केला होता. यातूनच आज भारतीय नौदलाला नवा ध्वज प्राप्त झाला आणि त्याचे अनावरण नरेंद्र मोदी यांनी केले.
दरम्यान, सर्वात आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे, हा ध्वज तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत राजमुद्रेतून नवे चिन्ह साकारण्यात आले आहे. सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती. अतिशय भक्कम आणि मजबूत असे नौदल त्याकाळात साकारण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि शिवकार्याचा यथार्थ गौरव आज यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात झाला.
जगभरातील शिवभक्त, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण होता. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच महाराजांच्या राजमुद्रेने नौदलाच्या ध्वजावरील पारतंत्र्याची शेवटची ओळख पुसली गेली.मात्र या घडामोडींवरून सुद्धा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांनी मोदी आणि भाजपला (BJP) लक्ष्य केले आहे.
ते म्हणाले, शहरांची नावं, वास्तूंची नावं बदलण्याच्या यशस्वी कार्यक्रमानंतर दिल्लीच्या साहेबांना अजून एक जबरदस्त कार्यक्रम सापडला आहे. झेंडे बदलण्याचा, आज नौदलाचा झेंडा बदलून दाखवला. बदल आणि बदला हे साहेबांच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य आहे. महागाई, बेरोजगारी कमी करणे म्हणजे बदल नसून झेंडे बदलणे म्हणजे खरा बदल आहे याची सव्वासौ करोड भारतीयांनी नोंद घ्यावी.