आम्हाला ज्या पद्धतीने सांगण्यात आले होते, त्यानुसारच मतदान केले – संजय शिंदे

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर  बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत.  ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार (Sanjay Shinde, Shamsunder Shinde, Devendra Bhuyar) यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. घोडेबाजारातील घोड्यांमुळं सरकारवर फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत, असा टोलाही राऊतांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान, दगाबाजीचा आरोप झाल्यानंतर आता आमदार संजय शिंदे यांनी राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. मी हरभरे खाणारा आहे की नाही ते उद्धवसाहेबांना (Uddhav Thackeray) माहीत, असे पलटवार त्यांनी केला आहे. दरम्यान,पराभव का झाला याबद्दल वरिष्ठ नेते मंडळीच सांगतील. आम्हाला ज्या पद्धतीने सांगण्यात आले होते, त्यानुसारच मतदान केल्याचे स्पष्टीकरण संजय शिंदे यांनी दिले.