राजापूर सह 41 अवर्षणप्रवण गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार – छगन भुजबळ

नाशिक – जलजीवन मिशन अंतर्गत येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी 162 कोटी निधी मंजूर झाला असून, या योजनेस प्रशासकीय मान्यताही पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून  प्राप्त झाली आहे. आज राजापूरसह 41 अवर्षणप्रवण व दुष्काळी गांवाचा कायमस्वरूपी सुटरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवला तालुक्यातील पन्हाळसाठे  व पिंपळखुटे 3 रे येथे जलजीवन मिशन अंतर्गत 41 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनसेसाठी असलेल्या जागेची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवडे, कार्यकारी अभियंता सुबोध मोरे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी,अंबादास बनकर,वसंत पवार, राधाकिसन सोनवणे,मोहन शेलार,सचिन कळमकर, तहसलिदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख,सरपंच धनराज पालवे,नगरसुलच्या सरपंच मंदाकिनी पाटील,प्रा ज्ञानेश्वर दराडे, परशराम दराडे, बाळासाहेब दाणे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, 2012 साली या योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. आज हे स्वप्न साकार झाल्याने मनस्वी समाधान लाभले आहे. या योजनेसाठी 3.5 एकर जागेची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या सहकार्यातून आवश्यक भूमीसंपादन प्रक्रिया रितसरपणे पार पाडली जाणार आहे. अतिरिक्त निधी  जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन  भुजबळ यांनी यावेळी दिली.

भुजबळ म्हणाले की, जागेसाठी स्थानिक पातळीवर ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. परस्पर समन्वयातून या कामाला गती मिळणार आहे. तत्पुर्वी येत्या महिन्याभरातच पाणी आरक्षणाची  पूर्तता करण्यात येणार आहे. एकसंघ भावनेतून  काम करून येत्या दोन वर्षातच सदर योजनेचे काम पूर्णत्वास येईल यात शंका नाही असा विश्वास पालमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळमखुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, घुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, अडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळमबुर्द, कोळगाव, कुसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, महालगाव, गणेशापूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या 41 अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांना या योजनेच्या लाभ मिळणार असून पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याने यावेळी  या गावांतील उपस्थित सरपंच व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.