मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवावी लागेल; बाळासाहेब थोरातांचे सूचक वक्तव्य 

मुंबई – शिंदे-फडणवीसांचं सरकार राज्यात आल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) शिंदे-फडणवीसांचं हे सरकार सहा महिनेच टिकेल अशी भविष्यवाणी केली आहे.  सोबतच मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशा सूचना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) आमदारांना दिल्या आहेत.

ज्या आमदारांना मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा ते काही दिवसांत स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेलं सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सहज कोसळण्याची शक्यता आहे, असं पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी देखील पवार यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

भाजपकडे 106 आमदार असतानाही दुय्यम भूमिका त्यांनी घेतली. हे सरकार चालेल असा भाजपला विश्वास असता तर देवेंद्र फडणवीस( Devendra Fadanvis) मुख्यमंत्री झाले असते. म्हणून ही तात्पुरती व्यवस्था भाजपनं केली आहे. कदाचित मध्यावधी निवडणूका लागतील, गुजरातबरोबर (Gujarat)महाराष्ट्राच्या निवडणुका होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

यातच आता  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही मोठं विधान केलं आहे. एकंदर ज्या पद्धतीने सरकार बनले त्याची स्थिती पाहता हे चालणार आहे का हे तर वादाचे आहे. या सरकारवर शंका येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवावी लागेल, असं बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. थोरात यांच्या या विधानामुळे काँग्रेसही (Congress) मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसून येत आहे.