महाराष्ट्रातील नेत्याला यूपीतील खासदाराकडून धमक्या दिल्या जात असताना राज्यातील नेते गप्प का ?  

मुंबई – मनसेचे  अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray)  यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा देत भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh)  यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असताना भाजपाचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह (BJP’s Kaisarganj MP Brijbhushan Singh) यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणि स्वपक्षाला अडचणीत आणले आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाचे नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत असले तरी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदाराने मात्र राज यांना आव्हान दिले आहे.

राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझं म्हणणं ऐकलं नाही, माफी मागितली नाही तर मी वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत. असं चिथावणीखोर वक्तव्य देखील त्यांनी केले आहे.

दरम्यान, एका मराठी नेत्याला अशा पद्धतीने इशारे जात असताना राज्यातील सर्वपक्षीय नेते मात्र या संघर्षाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. राज्यातील एकही मोठा मराठी नेता राज ठाकरे या मराठी नेत्याच्या पाठीमागे उभा राहताना दिसत नसल्याचे चित्र आहे. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार या देशाचा नागरिक देशातील कोणत्याही भागात जाऊ शकतो मग राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून रोखणारे हे महाशय कोण हा सवाल देखील उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे दोन्ही राज्यातील कोणतेही नेते या पेचप्रसंगातून शांततेत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे काही महाराष्ट्रातील नेत्यांनीच सिंह यांना पाठींबा दिला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.