विठ्ठलाच्या दरबारात तरूण शेतकर्‍यानं आत्महत्या केली, ऊर्जामंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये?

 अंबाजोगाई(प्रतिनिधी)-राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासुन शेतकर्‍यांना चांगली वागणुक मिळत नाही. सरकारची सारी धोरण शेतकरीविरोधी असुन हा वर्ग जणु काही आमचा शत्रुच आहे. अशा प्रकारची सापत्न वागणुक त्यांना मिळते. पंढरपुर विठ्ठलाच्या दरबारात सुरज जाधव या तरूण शेतकर्‍याने केवळ सरकारच्या आडमुठेपणामुळे आत्महत्या केली असुन याला सर्वस्वी महावितरण कंपनी आणि राज्याचे ऊर्जामंत्री जबाबदार असल्याची जोरदार टिका भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

कुलकर्णी म्हणाले, सुरज जाधव सोलापुर जिल्ह्यातील मगरवाडीचे रहिवाशी 22 वर्षाच्या तरूण शेतकर्‍याने फेसबुक लाईव्ह करत मी आत्महत्या का करतो?याला राज्य सरकारचे धोरण कारणीभुत आहे म्हणुन शेतात विष प्राशन केलं. मुळात हे सरकार सत्तेवर आल्यापासुन शेतकर्‍यांना मिळणार्‍या सवलती बंद झाल्या. कुठलेही अनुदान मिळत नाही. विमा मिळत नाही. अतिवृष्टीमुळे पिकाचं आणि शेतीचं नुकसान झालं तरी आर्थिक मदत भरीव नाही.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील शेतकर्‍यांच्या नावावर दिवसाआड बँकेत वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान पडायचे. रात्री अपरात्री मोबाईलच्या ठोकड्याचा मॅसेज वाजला की, पैसे पडले ही ओळख तयार झाली होती. मात्र शेतकरीविरोधी सरकार सत्तेवर आल्यापासुन एक दमडी शेतकर्‍यांना मिळत नाही. करोनासारख्या संकटामुळे अगोदरच शेती उद्योग धोक्यात आला. मागच्या वर्षी पाऊस प्रचंड झाला. पाण्याची पातळी वाढली पण शेतकर्‍यांना उपसा करण्यासाठी वीज वेळेवर नाही. सतत पुरवठा होत नाही. एवढंच काय सवाच्या आवा बीले देवुन निजामासारखी वसुली करायची आणि ज्या शेतकर्‍यांची वीज बाकी मिळाली नाही त्यांची कनेक्शन बंद करण्याची भुमिका ठाकरे सरकारने घेतली. ज्यामुळे शेतकरी प्रचंड वैतागुन गेलेला आहे.

सरकारच्या धोरणाला कंटाळुन बिचार्‍या जाधव नावाच्या तरूण शेतकर्‍यांने केलेली आत्महत्या दुर्दैवाची असुन याला जबाबदार महावितरण आणि राज्याचे ऊर्जामंत्रीच असल्याचा आरोप राम कुलकर्णी यांनी केला. खरं तर महावितरण कंपनीचे अधिकारी आणि ऊर्जामंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. सरकार कितीही शेतकर्‍यांच्या विरोधात भुमिका घेत असले तरी राज्यातील शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे. आत्महत्या सारखे मार्ग कुणीही अवलंब करू नये असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले.