अन्यायाच्या विरोधात लढणारा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे – संजय राठोड

वाशिम – समाजसेवेसाठी आपण राजकारणात आलो आहे. कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्यांची कामे आपल्याकडून केली जातात. गोरगरीब लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले पाहिजे याच भावनेतून कामे केली जातात. आसोला (खुर्द) ग्रामस्थांच्या घरकुल,रस्त्यांच्या, पुलाच्या,पाणीपुरवठा व अन्य समस्या प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली.

नुकताच मानोरा तालुक्यातील आसोला (खुर्द) येथील सोहंमनाथ महाराज संस्थानात ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री राठोड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना राठोड बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.महेश चव्हाण, कबीरदास महाराज,उत्तमराव ठवकर,पंचायत समिती सदस्य अभिषेक चव्हाण, माजी सभापती प्रेम राठोड व सुहास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

राठोड म्हणाले,अन्यायाच्या विरोधात लढणारा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मागील २५ वर्षापासून आरोग्य क्षेत्रात काम करीत असताना डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत आहे. मोलमजुरी करणारी व्यक्ती उपचारासाठी जेव्हा सरकारी दवाखान्यात येते, तेव्हा त्याला मदत करणे हे माझे कर्तव्य समजून मी काम करतो. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील. केवळ रस्ते व इमारती म्हणजेच विकास नव्हे तर घरोघरी समृद्धी आली तरच विकास होईल. येणाऱ्या काळात प्रशासनाला सोबत घेऊन जिल्ह्यात विकास कामे करण्यात येतील. सार्वजनिक आणि वैयक्तिक अडचणी देखील सोडविण्यात येतील. लोकसेवक म्हणून निश्चित चांगले काम केले जाईल. जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासोबतच कामानिमित्त जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चव्हाण म्हणाले, या भागात रोजगाराचा प्रश्न आहे. बंजारा समाजातील (Banjara Samaj) महिला कमी शिकल्या असल्यामुळे त्या कष्टाची कामे करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यांना अनेक आरोग्यविषयक समस्या आहेत त्यांना योग्य उपचार मिळत नाही. प्रसंगी काहींचा मृत्यू होतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्यासोबतच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. या भागातील युवा वर्गाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.