अनाथ, एकल बालकांचा निधी रोखणारे सरकार निर्दयी; यशोमती ठाकूर यांची फडणवीस-लोढांवर टीका

अमरावती – इडी सरकारने महाविकास आघाडीचे सर्व निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. काही निर्णय त्यांच्या फायद्यासाठी बदलून घेतले. मात्र जिथे अनाथ बालकांचा, एकल महिलांचा, दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या हितासाठी घेतलेला निर्णय हे सरकार कसं काय बदलू शकते असं म्हणत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी टीकास्त्र सोडले आहे.

सरकारमधील ही लोक असंवेदनशील आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाला महिला व बाल कल्याण विभागाचा मंत्री केलं आहे. त्याला फक्त काँक्रीट जंगल बांधता येतं , त्यांची हृदय देखील काँक्रीट आहेत. अर्थ खात्यानं देखील यावर नकारात्मक शेरा दिला आहे. या सर्वांचा निषेध असं त्यांनी म्हटलं आहे.

बाल संगोपनासाठी प्रत्येक लाभार्थीला दरमहा दोन हजार ५०० रुपये मिळावेत, यासाठी महिला व बाल विकास मंत्री म्हणून मी पाठपुरावा केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. बाकीच्या गोष्टी या सरकारला चालतात आणि ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी हे सरकार निर्दयीपणे निर्णय घेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया ॲड. यशोमती ठाकूर दिली.