शिवसेना आता लाचार सेना झाली आहे… आदित्य ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत – चिले 

पुणे  – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आरसा दाखवल्याने महाविकास आघाडी सरकारमधल्या तिन्ही पक्षांनी राज यांच्या भाषणावर सडकून टीका करायला सुरुवात केली असताना  आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपले काका राज ठाकरे आणि मनसेवर टीका केली आहे. ‘मनसे ही भाजपची ‘सी’ टीम आहे. आतापर्यंत मी त्यांना टाइमपास टोळी म्हणायचो. पण मला आनंद आहे की, आता या टोळीला काम मिळालं.’ असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मनसेवर जोरदार टीका केली.

दरम्यान, आता या टीकेला मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी आदित्य ठाकरे यांना रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आम्ही बाळासाहेब असताना शिवसेनेला महाराष्ट्रभिमानी सेना समजायचो, पण आता ती लाचार सेना झाली आहे…आम्हाला आनंद आहे आदित्य ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत… तेवढाच पवारांना टाईमपास… खेळवा बिंधास्त असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.