Health Campaign | मुरलीधर मोहोळ आणि आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ‘आरोग्यवारी अभियाना’चा शुभारंभ

Health Campaign | एका बाजूला ज्ञानोबा- तुकारामाचा जयघोष तसेच टाळ मृदुंगाचा गजर करत असताना वारीत चालत असणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी राज्य महिला आयोगाकडून चांगल्याप्रकारे पार पाडली जात आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ‘आरोग्यवारी अभियाना’च्या (Health Campaign) उद्घाटन कार्यक्रमात केले.

भवानी पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोगामार्फत पुणे महानगरपालिकेच्या सहाय्याने आयोजित या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, सचिव सचिव माया पाटोळे, राजलक्ष्मी भोसले, दीपक मानकर, हेमंत रासने, लक्ष्मी आंदेकर आदी उपस्थित होते.

वारकरी महिलांचे आरोग्य, सुरक्षितता, स्वच्छता आदींच्या अनुषंगाने हा उपक्रम चांगला असल्याचे सांगून मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, वारीमध्ये वृद्ध, मुली, गरोदर स्त्रिया तसेच स्तनदा माता अशा सर्व स्तरातील महिला अनेक दिवसांसाठी घरापासून दूर असतात. अशा वेळी सॅनिटरी नॅपकीन वाटपासारखा कौतुकास्पद उपक्रम राबविताना त्यांची धार्मिक, अध्यात्मिक परंपरा जपण्यासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोगाने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. या वारीदरम्यान आयोगाकडून २५० पेक्षा जास्त आरोग्य केंद्रे वारकरी महिलांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

आरोग्यवारी अभियानातील सातत्य कौतुकास्पद- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, वारीमध्ये महिला प्रवास करत असताना आरोग्याच्या अनेक समस्या होत असतात. अशा प्रसंगी त्यांची काळजी घेणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने आयोगामार्फत गेली तीन वर्षे हा उपक्रम सातत्य ठेऊन राबविण्यात येत आहे हे कौतुकास्पद आहे.

महिला या आधार, न्यायासाठी महिला आयोगाकडे पाहत असतात. कौटुंबिक हिंसाचार रोखणे, महिला अत्याचाराचे प्रश्न, सुरक्षिततेचे उपक्रम, विधवा पुनर्विवाह अशा अनेक बाबींमध्ये आयोगाकडून चांगले काम केले जात आहे. महिलांसाठी एक टोल फ्री नंबर उपलब्ध करून देऊन त्यावर कधीही संपर्क साधून समस्या, अडचणी मांडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षिततेची महाराष्ट्राची संस्कृती जपली जात आहे. राज्य शासनाने मांडलेल्या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे, असेही मोहोळ म्हणाले.

चाकणकर म्हणाल्या, गेल्या तीन वर्षापासून आरोग्यवारी अभियान राबविण्यात येत आहे.
महिलांसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी स्थापन कक्षामध्ये स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, वृद्ध महिलांसाठी विसावा कक्ष, सॅनिटरी नॅपकिन वेंडिग, तसेच बर्निंग मशीन, तसेच महिला डॉक्टर अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक १ ते दीड किलोमीटर अंतरावर सॅनिटरी नॅपकिन वेंडिग, तसेच बर्निंग मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्यासोबत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी स्थापन ‘१०९१’ टोल फ्री क्रमांकाची माहिती व्हावी म्हणून एलईडी व्हॅन, तसेच दर्शनी भागात लावण्याची व्यवस्था केली आहे, असे सांगून त्यांनी महिला आयोगाच्या कामकाजाची माहिती दिली.

प्रारंभी तटकरे यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियान आणि महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या कक्षात हिरकणी कक्ष, महिलांसाठी नॅपकिन वेंडिंग मशीन आदींचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत, उपायुक्त संदिप कदम, अविनाश सपकाळ, क्षेत्रीय अधिकारी अस्मिता तांबे आदींसह मनपा स्वच्छ उपक्रमातील महिला कर्मचारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like