पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर जयस्वाल झाला भावूक, आई-वडिलांना दिले क्रेडिट

IND vs WI : डोमिनिका मैदानावर सुरू असलेला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिला कसोटी सामना पाहुण्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. प्रथम फलंदाजी करत यजमान वेस्ट इंडिजने ६४.३ षटकात केवळ १५० धावाच केल्या. मात्र प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा वर्षाव झाला. युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने तर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक ठोकत विक्रमांची रास घातली आहे. या महत्त्वपूर्ण खेळीनंतर तो खूप भावूक झाला आणि त्याने आपली खेळी आपल्या पालकांना आणि संघ व्यवस्थापनाला समर्पित केली आहे.

या ऐतिहासिक खेळीनंतर जयस्वाल म्हणाला की, ‘मला वाटते की हा माझ्यासाठी भावनिक क्षणांपैकी एक आहे, भारतीय संघात संधी मिळणे कठीण आहे. मी सर्वांचे, समर्थकांचे, संघ व्यवस्थापनाचे आणि रोहित भाईंचे आभार मानू इच्छितो. डोमिनिकाची खेळपट्टी संथ आहे आणि आऊटफील्ड खूप संथ आहे, त्यामुळे फलंदाजी करणे कठीण आणि आव्हानात्मक होते. पण मला माझ्या देशासाठी अशाच मोठी खेळी करत राहायचे आहे, फक्त बॉल-बाय-बॉल खेळायचे होते आणि क्रिकेटचा आनंद लुटायचा होता.’