Chandrakant Patil | पुण्यातील जुन्या संस्थांचे जतन आणि विकास व्हावा

Chandrakant Patil | श्री शुक्ल यजु: शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा पुणेच्या वतीने उभारण्यात येणारा महर्षी याज्ञवल्क्य सांस्कृतिक भवनाचा प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. पुण्यातील पेठांमध्ये १०० वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणाऱ्या जुन्या संस्था आहेत. त्यांचे समाज सेवेचे कार्य अतिशय मोठे आहे. 97 वर्षे पूर्ण केलेली श्री शुक्ल यजु: शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा ही त्यापैकीच एक आहे. अशा सर्व जुन्या संस्थांचा विकास झाला पाहिजे, अशी भावना नामदार चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. तसेच, मुलींच्या मोफत शिक्षणाचा शासन आदेश लवकरच जाहीर होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री. शुल्क यजु: शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा पुणेच्या वतीने कसबा पेठेतील याज्ञवल्क्य आश्रमाच्या जागेत सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, संस्थेचे मनोज तारे, प्रमोद चंद्रात्रे, जगदीश नगरकर, सुचेता पाताळे, सुजाता मवाळ, तृप्ती तारे, भाजपा नेते हेमंत रासने, स्वरदाताई बापट, माजी नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर,गायत्री खडके,माजी नगरसेवक राजेश येनपुरे, विष्णू हरिहर, योगेश समेळ, भारत निजामपूरकर, दिलीप काळोखे, राजेंद्र काकडे, अरविंद कोठारी,प्रमोद कोंढरे,डॉ. गणेश परदेशी, अँड. मोहना गद्रे यांच्यासह संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नामदार पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, पुणे हे पेठांचे शहर आहे. या शहरात अनेक संस्था, संघटना वर्षानुवर्षे समाजसेवेचं काम अतिशय उत्तम पद्धतीने करत आहेत. त्यातील काही संस्थांनी आपले शतक महोत्सवी वर्ष देखील पार केले आहे. तर काही संस्था शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहेत. श्री. शुल्क यजु: शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा ही त्यापैकीच एक आहे. त्यांचे समाज सेवेतील योगदान लक्षात घेता, अशा सर्व संस्थांचा विकास झाला पाहिजे. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, संस्थेने हाती घेतलेला सांस्कृतिक भवनाचा प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. मात्र, संस्थेने केवळ छोटी वास्तू उभारून आपले काम मर्यादित ठेवू नये; तर पुणे शहराचे मध्यवर्ती भागातील स्थान लक्षात घेऊन, अतिशय भव्य आणि अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त अशी इमारत उभी करावी, समाज बांधवांकडूनही आवश्यक सहकार्य घ्यावे. त्यासोबतच यासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, शासनाची मुलींच्या शिक्षणाला सर्वाधिक प्राथमिकता आहे. त्यासाठीच आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मोफत शिक्षण देण्याची घोषणा मध्यंतरी केली होती. मात्र, लोकसभा आणि आता मुंबईत लागू असलेल्या आचारसंहितेमुळे त्याचा शासन आदेश जाहीर होण्यास विलंब झाला. लवकरच त्याची कार्यवाही पूर्ण होऊन, शासन आदेश लागू होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले की, समाजाच्या प्रत्येक घटकाला माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी वेळोवेळी मदत केली आहे. सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची नेहमीच भूमिका असते. याज्ञवल्क्य परिवार हा नेहमीच हिंदुत्ववादी चळवळींच्या नेहमीच पाठिशी राहिला आहे. अनेक कारणांमुळे तो नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिल्याने, त्यांना आपल्या शाखा वृद्धिंगत करण्यात मर्यादा येत होत्या. मात्र, या प्रकल्पाच्या माध्यमातून आता संस्थेने प्रसिद्धीपरांग्डमुख धोरणाचा त्याग करुन नवी झेप घेत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे मत मांडले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप