शरद पवार यांच्या निर्णयानंतर जयंत पाटलांना अश्रू अनावर, डोळे पुसत म्हणाले….

मुंबई : गेल्या ६० वर्षांपासून देशाच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली.

१ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असं सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, असं पवार म्हणाले. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल,” असं शरद पवार यांनी जाहीर केलं.दरम्यान, या घोषणेनंतर आता राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे.

दरम्यान,शरद पवार यांच्या निर्णयानंतर जयंत पाटील (Jayant Patil) भावूक झाले. जयंत पाटलांना अश्रू अनावर झाले. तसेच निर्णय मागे घेण्याची विनंती केली. आत्तापर्यंत महाराष्ट्रात आम्ही शरद पवार यांच्यामुळे आहोत. पक्षाच्या अध्यक्षपदावर राहणं हे देशासाठी आणि राज्याच्या हितासाठी आहे. त्यांनी असा निर्णय कुणालाही मान्य होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी निर्णय मागे घ्यावे, असे जयंत पाटील म्हणाले.