बाळासाहेबांच्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देण्याचा ठेका उद्धव ठाकरे गटाने खरच घेतला आहे काय ? 

प्राजक्त झावरे पाटील  –  बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना (Shiv Sena) पक्ष उभा राहिला. वाढत गेला, तळागाळात पोहचला, सत्ताधारी झाला. तो विचार होता.. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण.. झोकून देवून समाजासाठी जे करता येईल ते आधी करायचे मग राजकारण.. काय अफाट विचार होता. म्हणून तर तरुणांच्या फौजी त्यांच्यासोबत उभ्या राहिल्या. पण हाच बाळासाहेबांचा विचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात खूप मागे पडताना दिसत आहे. मागे सोडा या विचाराला पूर्णपणे तिलांजली देण्याचा चंग उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने बांधला आहे की काय.? असा प्रश्न आज माझ्यासारख्या सामान्यांच्या मनात निर्माण होत आहे. निमित्त आहे पैठण येथील एका कार्यक्रमाचे..!

महाराष्ट्रात आरोग्याचा महायज्ञ करणाऱ्या वैद्यकीय मदत कक्षाचा हा कार्यक्रम… दररोज कुठे ना कुठे होणारे असंख्य शिबिरे, हजारो मोफत बाल शस्त्रक्रिया, लाखो रुग्णांना थेट मदत, नेत्र शिबिरे, हृदयरोग शिबिरे, महापुरात सलग १५-१५ दिवसांचा सर्वत्र आरोग्य यज्ञ.. काय नि किती बाबी. नुसता या कक्षाच्या कामावर हजार पानांचा ग्रंथ सहज वरवरील बाबींवर तयार होईल, इतके बेफाम काम यांचे.. त्या कक्षाच्या सामाजिक कार्यक्रमाला राजकीय मुलामा देण्याचं काम उद्धव ठाकरे गटाचे आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केले आहे आणि अगदी डोळेझाक करून प्रसार माध्यमांनी देखील तीच री पुढे ओढली आहे. अंबादास दानवे हे ते करतीलच हे गृहीत धरले तरी प्रसार माध्यमे मात्र डोळे मिटून होती, हे जास्त वेदनादायी आहे.

तर पैठण येथे गुरुवर्य धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिरासारख्या सामाजिक कामाचे  आयोजन तेथील वैद्यकीय मदत कक्षाच्या तरुण टीमने केले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या टीमचे जवळपास सर्व कार्यक्रम हे राजकारणा पलीकडीचे असतात. त्यांच्या साठी महत्वाचा असते ती रुग्णसेवा. या रुग्णसेवेच्या अत्यंत पुण्याच्या कार्याला मंत्री संदीपान भुमरे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय मदत कक्ष मराठवाडा प्रमुख दादासाहेब थेटे आणि ही सेवा करणारे समाजसेवक तसेच रक्तदान करण्यासाठी इच्छुक असणारे सामाजिक भान जपणारे लोक इथे उपस्थित होते. त्यामुळे मंत्री भुमरे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला खुर्च्या रिकाम्या म्हणणाऱ्या आणि एका अत्यंत उच्च सामाजिक कामाला १००% राजकीय रंग देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या खालच्या दर्जाचे राजकारण करणाऱ्या गटाला काही प्रश्न विचारावसे वाटते.

१. रक्तदान शिबिर हा कार्यक्रम सामाजिक की राजकीय असतो..?

२. पैठण येथील कार्यक्रम मंत्री भुमरे यांच्या स्वागताचा होता की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिराचा होता..?

३. रुग्णांची जात, पात, धर्म, पक्ष न पाहता निरपेक्ष मदत करणाऱ्या वैद्यकीय मदत कक्षाला देखील राजकीय रंग देणार का.?

४. मंत्री भूमरे सामाजिक कामात सहभागी झाले हे अभिमानास्पद आहे की दुर्दैवी..?

५. स्वागत सोहळे, शक्ती प्रदर्शन ही कंत्राटी गर्दी महत्वाची की रक्तदान शिबिराला होणारी सामाजिक भान जपणाऱ्या देशभक्तांची गर्दी..?

६. जवळपास १३०-१५० लोकांनी (राजकीय संघटना दूर ठेवून) रक्तदान केले त्यांनी जे केले ते चूक की बरोबर..?

७. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या या टीमला शाबासकी द्यायची की त्याचे राजकारण करायचे.?

८. आपल्या हिमतीवर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या तरुणांच्या कामाची शाबासकी, त्याची पावती ही अशी दिली जाते का.? ही सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची नैतिक गळचेपी नाही का.?

९. बाळासाहेबांच्या विचाराना खऱ्या अर्थाने कोण पुढे नेत आहेत.? रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे घेणारे की कावीळ झाल्यासारखे खालच्या दर्जाचे राजकारण करणारे..?

अजून खूप प्रश्न आहेत.पण तूर्तास यांची उत्तरे तरी शोधा.. प्रसार माध्यमांनी देखील या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची तसदी घ्यावी ही माफक अपेक्षा..! आणि हो बाळासाहेबांच्या विचारांना पूर्णतः तिलांजली देण्याचा ठेका घेतलेल्या बहाद्दराना देखील मनापासून शुभेच्छा..! वैद्यकीय मदत कक्षात काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्या सर्वांना बळ देणारे मंत्री आहेत तोवर बाळासाहेबांचा खरा विचार जिवंत राहील, याची खात्री आहे.