सहा महिन्यात नाही, पण वर्षभरात शिंदे सरकार कोसळेल; नाना पटोले यांची भविष्यवाणी 

Solapur – राज्यात सत्तांतर होऊन अजून आठवडा देखील झाला नसताना विरोधक मात्र सरकार कधी कोसळणार याबाबतची भविष्यवाणी करू लागले आहेत. आधी जेष्ठ नेते शरद पवार मग खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार कधी कोसळेल याबाबत वक्तव्य केले आहे.सोबतच  पटोले यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

शिंदे सरकार लवकर पडणार असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी सर्वात आधी सहा महिन्यात हे सरकार कोसळणार असून राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यापासून ते थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही शिंदे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)  यांनी सहा महिन्यात नाही, पण वर्षभरात शिंदे सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे सरकार कधी कोसळणार याबाबत आघाडीतच संभ्रम असल्याचं दिसत आहे. दरम्यान, सत्ताधारी मात्र हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावा करत आहेत.