राज्यात महाविकास आघाडीची ताकद; पदवीधर निवडणुकीत विजय निश्चित  – छगन भुजबळ

नाशिक  :- राज्यात ताकद महाविकास आघाडीची असून पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडणूक आणण्यासाठी एकजुटीने काम करावे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुक महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार दिपीका चव्हाण, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिवराम झोले, शिवसेना उपनेते सुनील बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, कविताताई कर्डक, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, अशोक सावंत,अर्जुन टिळे,निवृत्ती अरिंगळे, डॉ.सयाजीराव गायकवाड, पुरुषोत्तम कडलग, अंबादास खैरे, डॉ.योगेश गोसावी, माजी नगरसेवक शैलेश ढगे, समिना मेमन, जगदीश पवार,समाधान जेजुरकर, महेश भामरे, संजय खैरनार, मकरंद सोमवंशी, नाना पवार, किशोरी खैरनार,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण शुभांगी पाटील यांना आहे. पदवीधर मतदासंघात पहिल्या महील्या उमेदवार म्हणून त्यांचा विजय पक्का असून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा आपल्याला एकत्र यायचे आहे. तो पर्यंत सर्वांनी परिश्रम घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने उभी राहील अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

ते म्हणाले की, पदवीधर निवडणूक ही आगामी निवडणुकांमधील महाविकास आघाडीचा पाया असून सर्व पदवीधर मतदारानी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी तयारीला लागावे. आपली एकजूट टिकून ठेवत आघाडी अधिक मजबूत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते म्हणाले की, उमेदवारी मिळून देखील अर्ज न भरणे ही पक्ष विरोधी घेतलेली भूमिका अतिशय चुकीची आहे. त्यामुळे जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे मतदारांनी किती विश्वास ठेवावा असा सवाल त्यांनी विरोधकांना यावेळी दिला. यावेळी उमेदवार शुभांगी पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, दत्ता गायकवाड, प्रेरणा बलकवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.