थम गया सुरों का कारवां, लतादीदींच्या निधनाने संगीतातले एक पर्व संपले – छगन भुजबळ

मुंबई – लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले असल्याच्या शोकभावना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ यांनी लता मंगेशकर म्हणजे संगीतातील पूर्णविराम. त्यांच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमीं मंत्रमुग्ध होत असत. म्हणूनच त्यांना संगीतातील गानसरस्वती म्हटले जायचे. आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील असेही छगन भुजबळ म्हणाले.

“नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ ही पहचान है ग़र साथ रहे… !” लतादीदी यांनी गायलेल्या या गाण्याप्रमाणे आज शरीराने जरी त्या नसल्या तरी त्यांचे स्वर कायम आपल्यात राहतील. लतादीदी यांच्या निधनाने मंगेशकर कुटुंबियांवर व संगीतप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर त्यांच्या मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना देखील छगन भुजबळ यांनी केली आहे.