राज ठाकरे हे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? छगन भुजबळ यांचा राज ठाकरेंना सवाल 

नाशिक :- छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) राज्यातील प्रत्येक घटकाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली, त्यांनी सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीच फार मोठं काम केलं. म्हणून पवार साहेब म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहे. अगदी प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील बरचसं काम फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर केलं आहे. त्यामुळे त्याचं नाव घेण्यात वावगे काय आहे, शरद पवार (Sharad Pawar) हे नेहमी शिवाजी महाराजांबद्दल बोलतात मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) हे फुले, शाहू,आंबेडकरांचे नांव का घेत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

रत्नगिरी येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी खा.शरद पवार साहेबांबद्दल वक्तव्य केलं. त्यानंतर आज नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला.

राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना छगन भुजबळ म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांसोबत मी गेल्या ९१ सालापासून आहे. पवार साहेब हे अनेक भाषणांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात तसेच त्यांच्या इतिहासाची उजळणी देखील ते करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पवार साहेबांची प्रकट मुलाखत घेतली त्यात त्यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी पवार साहेबांनी स्पष्ट सांगितले की, महाराष्ट्र म्हटल की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतल जात. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील सर्व घटकांचे आहे. महाराष्ट्रात असा एकही घटक नाही जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राज्यात फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारखे समाज सुधारक होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वव्यापी होते. त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेतलं असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीमध्ये मोठ योगदान दिलं. म्हणून पवार साहेबांनी म्हटल आहे की, संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे फुले, शाहू, आंबेडकर यांना मानतात. दिल्लीत आपले जे ही नेते काम करतात त्यांना दिल्लीत मराठा नेते असे म्हटले जाते. अगदी तो नेता कुठल्याही समाजाचा असला तरी अस उत्तर पवार साहेबांनी राज ठाकरे यांना दिल असल्याची आठवण त्यांनी राज ठाकरे यांना करून दिली.

तसेच ते पुढे म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून मांडले. ही पुस्तके माझ्या संग्रही आहे ती पुस्तके मी वाचतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत फुले, शाहू आंबेडकर यांचे नाव घेतले तर त्यात बिघडत कुठे अशी टिपणी देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केली.