संजय राठोड यांचा विषय संपवूया, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत – चित्रा वाघ

अमरावती – पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करून पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली होती. राठोड यांच्या विरोधातील लढा कायम राहिल असे विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले होते. आता राठोड यांचा विषय संपवूया, राज्यात अनेक प्रश्न आहेत असे वक्तव्य वाघ यांनी केले आहे.

याबाबतची बातमी टाईम्स नाऊ मराठीने प्रसिद्ध केली आहे.  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाबाबत त्यांना जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या,तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना क्लीनचिट दिली होती, त्यांना हा प्रश्न विचारा. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते त्यांना हा प्रशन विचारा इतकेच काय पुण्याचे पोलीस आयुक्त यांनाही राठोड यांना प्रश्न विचारा. यात मी कुठलीही पळवाट काढत नाही. जर कोर्टात जाणे पळवाट असेल तर सध्या राज्यात प्रत्येक जण पळवाट काढत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना क्लीन चिट दिल्याचे म्हटले आहे. राठोड यांच्याबद्दल मी प्रश्न  दररोज विचारत असते, माझा लढा सुरू आहे. न्यायव्यवस्थेवर सगळ्यांचा विश्वास आहे. न्यायालयातून मला न्याय मिळेल अशी मला खात्री आहे. कोर्टात आम्ही सर्व पुरावे सादर केले आहेत. मंत्री असो वा नसो मी माझी लढाई लढणारच असेही वाघ म्हणाल्या.