‘महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ आणि पवार साहेबांच्या  नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष करु’

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. दरम्यान,शरद पवार ज्या वैचारिक भूमिकेची मांडणी करत होते ती एवढी कमकुवत आहे का असा सवाल उपस्थित होत असून अजित पवारांचे बंड म्हणजे शरद पवारांचा वैचारिक पराभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

अजित पवारांच्या या निर्णयामागे शरद पवार आहेत, अशा चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले असताना आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ आणि शरद पवार साहेबांच्या (Sharad Pawar) नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष करु असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात साहेबांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी काम करणार असल्याचे रोहित पाटील म्हणाले. सामान्य माणूस ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचे पाटील म्हणाले.

सध्या प्रसंग बाका असताना आपण सर्वांना एकत्र भूमिका घ्यावी लागेल. ज्याप्रमाणे मावळ्यांनी छत्रपती सिवाजी महाराजांसाठी वाटेल ते करण्याची भूमिका घेतली, तीच भूमिका पवार साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल असे रोहित पाटील म्हणाले. साहेबांच्या विचारांची खूनगाठ आपण सर्वजण बांधूया आणि राज्यात पुन्हा आपली सत्ता आणू अशी शपथ घेऊयात असेही रोहित पाटील यावेळी म्हणाले.