सरकारचा असंवेदनशीलपणा : २४ तास उलटून गेले तरी राजेंच्या तपासणीला नाही पाठवला डॉक्टर !

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर राज्य शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. ठाकरे सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात आता असंतोष वाढू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. खरतर मराठा समाजाच्या मागण्या 15 दिवसात मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नसल्याचे चित्र आहे.

संभाजीराजे यांना आता संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत आहे. राजकीय नेते देखील राजेंच्या भेटीला आझाद मैदानावर हजेरी लावत आहेत. दुसरीकडे आझाद मैदानावर आता संपूर्ण राज्यभरातुन लोक जमायला सुरवात झाली आहे. दरम्यान, नियमानुसार उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणीसाठी सरकारकडून डॉक्टर पाठवण्यात येत असतो. मात्र संभाजी राजेंच्या वैद्यकीय तपासणीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून डॉक्टर पाठवण्यात आला नसल्याचा आरोप आझाद मैदानावरील आंदोलकांनी केला आहे. ‘राज्य शासनाने डॉक्टर पाठविणे गरजेचे असताना २४ तासांनंतरही युवराज संभाजीराजेंची शासकीय वैद्यकीय तपासणी करीता एकही डॉक्टर सरकारने पाठविलेला नाही. सरकारच्या या असंवेदनशीलतेचा सर्वजण निषेध करत आहोत’. अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत.